Kalyan News: कल्याणमधील एका उच्चभ्रू सोसायटीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता चक्क खंडणीच्या प्रकरणापर्यंत जाऊन पोहोचला आहे. सोसायटीतील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चक्क दर महिन्याला 16000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरी दोन महिला प्राणी मित्रांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कल्याणमधील वाधवा मेडोज सोसायटीमध्ये सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याणमधील वाधवा मेडोज या हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांनी गेल्या काही दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. या कुत्र्यांपासून सुटका मिळवण्यासाठी रहिवाशांनी प्राणी मित्रांकडे मदत मागितली होती. मात्र, ही मदत करण्यासाठी संबंधित प्राणी मित्र महिलांनी रहिवाशांकडे पैशांची मागणी केली.
या कुत्र्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी आणि त्यांची व्यवस्था करण्यासाठी दर महिन्याला 16000 रुपये द्यावे लागतील, अशी अट या महिलांनी घातली. एका सामाजिक समस्येवर उपाय शोधण्याऐवजी त्यासाठी पैशांची मागणी केल्याने सोसायटीतील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली.
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या हाय प्रोफाईल सोसायटीतील भयंकर भांडण, शेजारच्या अंगावर सोडला कुत्रा, 3 दिवस... )
80 रहिवाशांना कुत्र्यांनी घेतला चावा
या सोसायटीमध्ये गेल्या 4 महिन्यांच्या कालावधीत भटक्या कुत्र्यांनी तब्बल 80 जणांना चावा घेतला आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या मोठी असल्याने पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. वारंवार तक्रार करूनही कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिक हैराण झाले होते.
त्यातच कुत्रे हलवण्याच्या नावाखाली दरमहा 16000 रुपयांची मागणी झाल्याने हा वाद विकोपाला गेला. रहिवाशांच्या तक्रारीनंतर खडकपाडा पोलिसांनी हिरा राजपूत आणि रत्ना पुरोहित या दोन महिला प्राणी मित्रांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये सरकारी जमिनीवर बारचा 'पुनर्जन्म'; तीन वेळा तोडला तरी पुन्हा उभा राहिलाच कसा? )
प्राणी मित्र आणि रहिवाशांमध्ये आरोप-प्रत्यारोप
या प्रकरणात आता दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. एकीकडे रहिवाशांनी खंडणीचा आरोप केला असताना, दुसरीकडे प्राणी मित्रांनी देखील रहिवाशांच्या विरोधात तक्रार दिली आहे. सोसायटीतील लोक कुत्र्यांना खाऊ देत नाहीत, त्यांच्याशी निर्दयीपणे वागतात आणि आपल्याला धमकावतात, असा आरोप या महिलांनी केला आहे. मात्र, दरमहा 16000 रुपयांच्या मागणीच्या मुद्द्यामुळे हे प्रकरण आता कायदेशीर पेचात अडकले आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, खंडणीच्या या अँगलनं संपूर्ण शहरात चर्चा रंगली आहे.
सोसायटीमधील 80 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतरही कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) याकडे गांभीर्याने का पाहत नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्राणी मित्रांनी पैशांची मागणी केल्यामुळे हा वाद वाढला असला, तरी मूळ प्रश्न भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताचा आहे. पालिकेने तातडीने या कुत्र्यांना तिथून हलवून नागरिकांना सुरक्षित करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. आता पोलीस तपास आणि पालिकेची कारवाई याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.