जाहिरात

Kalyan News: कल्याणमध्ये सरकारी जमिनीवर बारचा 'पुनर्जन्म'; तीन वेळा तोडला तरी पुन्हा उभा राहिलाच कसा?

Kalyan News: कल्याणमधील या बारवर एकदा किंवा दोनदा नाही, तर चक्क तीन वेळा तोडकाम कारवाई करण्यात आली आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये सरकारी जमिनीवर बारचा 'पुनर्जन्म'; तीन वेळा तोडला तरी पुन्हा उभा राहिलाच कसा?
Kalyan News:  कल्याणमधील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
कल्याण:

Kalyan News:  कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शुक्रवारी एका अनधिकृत बारवर झालेल्या कारवाईदरम्यान प्रचंड मोठा राडा झाला. कल्याण तहसील विभागाच्या पथकाने सत्यम उर्फ श्री गणेश बारवर जेसीबीच्या साहाय्याने हातोडा चालवला, मात्र यावेळी स्थानिक नागरिक आणि बार समर्थकांनी या कारवाईला जोरदार विरोध केला. विशेष म्हणजे या बारवर एकदा किंवा दोनदा नाही, तर चक्क तीन वेळा तोडकाम कारवाई करण्यात आली आहे. वारंवार कारवाई होऊनही हा बार पुन्हा उभा कसा राहतो आणि यामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण तहसील विभागाचे पथक शुक्रवारी सकाळी पोलीस बंदोबस्तासह कोळसेवाडीतील या बारवर धडकले. जेसीबीने तोडकाम सुरू होताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि बारशी संबंधित लोकांनी याला तीव्र विरोध दर्शवला. 

तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि विरोध करणाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर मोठ्या वादात झाले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी परिस्थिती हाताळत जमावाला पांगवले आणि तणाव दूर केला. या राडा प्रकरणात तहसील विभागाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.

( नक्की वाचा : Akola News: मामाच्या गावी गेलेल्या सचिनचा शेतात सापडला विद्रूप मृतदेह; अंगावरील खुणांमुळे संशयाचे काहूर )

तीन वेळा तोडला तरी....

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या बारवर झालेली ही तिसरी कारवाई आहे. हा बार गुरचरण म्हणजेच सरकारी जमिनीवर बांधला गेला आहे. नियमानुसार तहसील विभागाने यापूर्वी दोन वेळा यावर तोडकाम केले होते. मात्र, प्रशासकीय यंत्रणेला आव्हान देत प्रत्येक वेळी हा बार पुन्हा त्याच ठिकाणी उभा राहतो. 

एकदा कारवाई झाली की काही दिवसांतच बांधकाम पूर्ण करून बार पुन्हा सुरू केला जातो. या वारंवार घडणाऱ्या प्रकारामुळे तहसील विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीतील प्रसिद्ध शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाकडून शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी;शहरात संताप )

प्रशासकीय यंत्रणेचे पितळ उघडे

या अनधिकृत बारच्या पुनरुज्जीवनामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) अधिकाऱ्यांचे आशीर्वाद या बार मालकावर आहेत का, अशी चर्चा आता रंगली आहे. याबाबत कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सत्यजीत चव्हाण यांनी सांगितले की, ही जागा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येते, मात्र हे कार्यक्षेत्र महानगरपालिकेचे आहे. तहसील विभाग कारवाई करतो, पण त्यानंतर तो पुन्हा उभा कसा राहतो, याचे समाधानकारक उत्तर यंत्रणांकडे नाही. या लपंडावामुळे सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न अधिक गंभीर झाला असून सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com