Kalyan News:लग्नाच्या 2 दिवस आधी काका-पुतण्यात तुंबळ हाणामारी; कल्याणच्या घटनेला नवं वळण, पोलिसही चक्रावले!

Kalyan News: कल्याणमधील वाडेघर परिसरात दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Crime News : कल्याणमधील हाणामारीच्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
कल्याण:

Kalyan News: कल्याणमधील वाडेघर परिसरात दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका बाजूला पुतण्याने आपल्या आंतरजातीय विवाहामुळे काकाने जीवघेणा हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर दुसऱ्या बाजूला काकाने हे सर्व आरोप फेटाळून लावत हा केवळ जमिनीचा जुना वाद असल्याचे म्हटले आहे. या घटनेत दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले असून खडकपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील पीडित तरुण संदेश शेलार याचे येत्या रविवारी लग्न होणार आहे. घरात लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण असतानाच ही धक्कादायक घटना घडली. संदेशच्या दाव्यानुसार, तो दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न करत असल्यामुळे त्याचे काका त्याच्यावर प्रचंड नाराज होते. याच नाराजीमधून काकाने संदेश आणि त्याच्या आईवर लोखंडी रॉड आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. 

Advertisement

आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईमध्ये पडली असता, त्यांनाही निर्दयीपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात माय-लेक दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

( नक्की वाचा : Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम' )

जमिनीचा वाद आणि बदनामीचा कट?

दुसरीकडे, संदेशचे काका विनेश शेलार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विनेश शेलार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. याच जमिनीच्या वादातून संदेश शेलार आणि त्याच्या आईने आपल्याला मारहाण केली आहे.

आंतरजातीय विवाहाचा मुद्दा केवळ बदनाम करण्यासाठी आणि प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी जाणीवपूर्वक उपस्थित केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विनेश शेलार हे देखील या हाणामारीत जखमी झाले असून त्यांनी संदेशवर पलटवार केला आहे.

( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar: आधी हसून-खेळून फोटो काढले, मग चाकूने सपासप वार करून मित्राचा खेळ खल्लास ! )

वाडेघरमधील या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. हा हल्ला खरोखरच आंतरजातीय विवाहाच्या रागातून झाला की त्यामागे केवळ जमिनीचा वाद कारणीभूत आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. लग्नाच्या दोन दिवस आधीच घरात रक्ताचा सडा पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article