बाणेर परिसरात एका कोरियन नागरिकावर भरदिवसा हल्ला करून मोबाइल चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 17 मे 2025 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता तुकाईमाता मंदिराजवळील टेकडीवर ट्रेकिंग करत असताना घडली. पार्क सुंग हो (वय 45) हे मूळचे दक्षिण कोरियाचे असून सध्या बालेवाडी येथील नंदन प्रॉस्पेरा सोसायटीमध्ये राहतात. ते तळेगाव एमआयडीसीतील ह्युंडई मोटर्स इंडिया येथे लँडिंग इंजिनीयर म्हणून काम करतात. धक्कादायक बाब म्हणजे ज्या तिघांनी कोरियन अभियंत्यावर हल्ला केला त्यांच्यावर दहा दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचंही उघड झालं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्क ट्रेकिंग करत असताना एकाने, त्याचा मागून आवाज दिला. ते वळताच दुसऱ्या तरुणाने त्यांना पकडले, तिसऱ्याने त्यांच्या पॅंटच्या खिशातून सॅमसंग S24 हा सुमारे 72,000 किमतीचा मोबाइल जबरदस्तीने काढून घेतला. झटापटीत पार्क खाली कोसळले आणि त्यांचा चष्मादेखील तुटला.
पार्क यांनी एफआयआरमध्ये नमूद केले की, ते फेब्रुवारी 2024 मध्ये भारतात आले असून मागील तीन महिन्यांपासून ते कोरियन सहकाऱ्यांसोबत बालेवाडी येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी आपला जबाब हिंदी समजूनच नोंदवला असल्याचे स्पष्ट केले आहे. बाणेर टेकडीवर दक्षिण कोरियन नागरिकाला लुटणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या तिघांपैकी दोघांनी 19 मे रोजी चिखली येथून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचेही निष्पन्न झाले असून, पोलिसांनी त्या मुलींची सुटका केली आहे. वाशीम येथे जाऊन या मुलींची सुटका केली.
नक्की वाचा - Sangli News : 'तक्रार मागे घेण्यासाठी दीड कोटींचं आमिष'; बलात्कार पीडितेचे तत्कालिन गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप
पोलिसांना माहिती मिळाली की जाधववाडी, चिखली येथे एकजण चोरीचा मोबाईल विकण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी सापळा रचून दिगंबर साळुंखे (20) याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मोबाइल हस्तगत केला. साळुंखे हा वाहन मेकॅनिक असून त्याने बाणेर टेकडीवरील लुटीची कबुली दिली आणि आपल्या साथीदारांची नावे उघड केली – विशाल समुखराव (19) आणि विशाल कांबळे (19).
बाणेर पोलिसांनी साळुंखेकडून आणखी एक मोबाईल आणि एक दुचाकी जप्त केली आहे. तपासादरम्यान समुखराव आणि कांबळे यांनी १९ मे रोजी चिखलीतील दोन अल्पवयीन मुलींना पळवून वाशीमकडे नेल्याचे उघड झाले. त्याचावर अपहरणाचे दोन गुन्हे आधीच नोंदवण्यात आले होते. पोलिसांनी वाशीममध्ये जाऊन त्यांना ताब्यात घेतले आणि मुलींची सुटका करून त्यांच्या पालकांकडे सुपूर्त केले. या घटनेमुळे बाणेर परिसरातील परदेशी नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भरदिवसा, ट्रेकिंग स्पॉटवर घडलेल्या या घटनेने पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण केली आहे.