
अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट A 171 ने इतक्या जखमा दिल्या आहेत की, त्या भरून काढणे किंवा त्यावर मलमपट्टी करणे कदाचित कधीही शक्य होणार नाही. या अपघातात अनेकांनी आपल्या जवळचे लोक गमावले. पण अशा दोन चिमुकल्या आहेत, त्यांनी तर या अपघातामुळे आपलं सर्वच गमावलं आहे. लंडनमध्ये आपल्या वडीलांची वाट पाहत असलेल्या 8 आणि 4 वर्षांच्या दोन लहान बहिणींनी जे काही गमावलं आहे ते त्यांच्या आयुष्यात कधीच भरून निघणारं नाही. या दोन्ही चिमुकल्या केवळ 18 दिवसांच्या आत अनाथ झाल्या आहेत. या दोन्ही मुलींच्या आईचे 26 मे रोजी लंडनमध्ये कॅन्सरमुळे निधन झाले. त्यात भर म्हणून की काय त्यांनी आपल्या वडीलांनाही अहमदाबाद विमान अपघातात गमावलं आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आले भारतात
या चिमुकल्या आपल्या आई भारतीच्या मृत्यूच्या दुःखातून अजून सावरल्या नव्हत्या. त्याच वेळी आता त्यांच्या वडिलांचाही जीव गेला आहे. अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या विमानात त्यांनी आपले वडील अर्जुन पटोलिया यांनाही गमावले आहे. 37 वर्षांचे अर्जुन आपल्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते. पत्नी भारतीची इच्छा होती की, तिच्या मृत्यूनंतरचे विधी गुजरातमध्ये केले जावेत. त्यांनी वडोदऱ्यापासून 60 किलोमीटर दूर असलेल्या पोइचा येथील नीलकंठधाममध्ये नर्मदा नदीत त्यांची अस्थी विसर्जित केल्या. त्यानंतर अमरेली जिल्ह्यातील त्यांच्या वडिलोपार्जित गावी वाडिया येथेही विधी केले.
अस्थी विसर्जनानंतर निघाले होते लंडनला
पत्नीचे मृत्यूनंतरचे सर्व विधी केल्यानंतर अर्जुन पटोलिया लंडनला परतत होते. तेव्हा नशिबाने त्यांना आणखी एक क्रूर धक्का दिला. त्यांची आई सुरतमध्ये राहते. अर्जुनचे चुलत भाऊ संजय म्हणाले, ‘माझ्या वहिनी भारती यांची इच्छा होती की, त्यांचे अंत्यसंस्कार भारतातच व्हावेत, म्हणून अर्जुन त्यांच्या अस्थी इथे घेऊन आले होते.' संजय यांचे म्हणणे आहे की, काही दिवसांतच त्यांना अर्जुनचेही अंत्यसंस्कार करावे लागतील असे त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. अर्जुनने 1990 मध्ये आपल्या वडिलांना गमावले होते. लहानपणापासूनच त्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यांना आईने वाढवले. त्यांची आई कटलरी आणि घरगुती वस्तू विकून घर चालवत होती.
17 वर्षांपासून होते लंडनमध्ये
अर्जुन 20 व्या वर्षी लंडनला गेले होते. तिथे जाण्यापूर्वी त्यांनी सुरतमधील स्वामीनारायण गुरुकुलमध्ये 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. ते गेल्या 17 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. तिथे त्यांनी फर्निचरचे दुकान काढले होते. त्याच ठिकाणी त्यांची भारती बरोबर भेट झाली. भारती ही अकाउंटंट होती. पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्येच दोघांनीही लग्न केले. त्यांना दोन मुली ही झाल्या. त्यांचे जिवन चांगले चालले होते. भारती कच्छ जिल्ह्यातील रहिवासी होत्या. त्यांचे कुटुंब आता अहमदाबादमध्ये स्थायिक झाले आहे.
आईने दिले डीएनए सॅम्पल
भारतीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंब अलीकडेच गेल्या रविवारी नर्मदा तिरी एकत्र आले होते. भारतीच्या मृत्यूने सर्वच जण दुख:त होते. त्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. त्यात आता अर्जुनच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. सर्वच जण कोलमडून गेले आहेत. अर्जुनचे लहान भाऊ गोपाल हे लंडनमध्येच राहतात. आता अर्जून यांच्या दोन्ही मुलांची काळजी ते घेत आहेत. अर्जूनच्या आईने मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांचे डीएनए सॅम्पल दिले आहे. मृतदेह मिळाल्यानंतर अंत्यसंस्कार वाडिया येथे करण्यात येणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world