Maharashtra News Rape Case : पुण्यातील एका ४ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. ही घटना ताजी असताना महिला अत्याचाराच्या कित्येक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या. यानंतर महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान याबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
रोहित पवारांनी राज्य सरकारविरोधात गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. सरकार गुन्ह्यांवर अंकुश लावण्याऐवजी पोलीस दलाचा उपयोग राजकीय विरोधकांना दाबणे आणि व्हिआयपी सुरक्षेसाठी करीत आहेत.
शक्ती कायद्यावरुन केंद्रावर निशाणा...
रोहित पवार यावेळी म्हणाले, संत आणि महापुरुषांच्या या पुरोगामी राज्यात महिलांचा सन्मान करायला शिकवलं जातं, अशा महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार होणं दुर्देवी आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना शक्ती कायदा लागू करण्यात आला होता. आमची मागणी आहे की, महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर एक विशेष सत्र बोलावून शक्ती कायदा पुन्हा लागू करावा.
चार्टशील दाखल करण्यात दिरंगाई...
रोहित पवार यांनी बदलापूर, चाकण, बीड, गोंदिया, बारामती आणि मावळ सारख्या घटनांचा हवाला देत सांगितलं की, अनेक प्रकरणात ९० दिवसांनंतरही चार्टशीट दाखल करण्यात आली नाही. त्यांचा आरोप आहे की, या पीडितांना न्याय मिळवून देण्यात दिरंगाई केली जात आहे.