रमेश शर्मा, प्रतिनिधी
Mira-Bhayandar Crime News : मिरा-भाईंदर शहरातील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीशी दोन तरुणांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली.या प्रकरणी नवघर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
आरोपींनी शेर्यास मिश्राला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं
डीसीपी राहुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना 12 तारखेला भाईंदर पूर्वेतील पूजा नगर परिसरात घडली.फिर्यादी शेर्यास मिश्रा हा त्याच्या घरी असताना रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी आशिष राज याने त्याला घराखाली बोलावले.त्यानंतर आरोपींनी शेर्यास मिश्राला जबरदस्तीने कारमध्ये बसवून रात्रभर मिरा-भाईंदर शहरात फिरवत विविध ठिकाणी बेदम मारहाण केली.
नक्की वाचा >> NEET Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी आणखी एका मास्टरमाईंडला अटक, पुण्यातील 'ती' शिक्षिका गजाआड
अपहरण, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल
आरोपींनी त्याच्या अंगावर सिगारेटचे चटके दिल्याचाही आरोप आहे.सकाळी शेर्यास मिश्रा याला घरी सोडण्यात आले.मात्र,त्याची प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी नवघर पोलिसांनी अपहरण, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे,तर तीन आरोपी अजूनही फरार आहेत.डीसीपी राहुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम त्रिकोणातून हा प्रकार घडल्याची शक्यता असून पुढील तपास नवघर पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world