Baba Bangali Arrested: मुंबई लोकलने प्रवास करत असाल तर तुम्ही खिडक्या, दरवाजे इतकंच काय तर बसण्याच्या जागेवरही बाबा बंगालीची (Baba Bangali Arrested News) जाहिरात पाहिलीच असेल. कोणत्याही समस्यांवर या बंगाली बाबाकडे उपाय असल्याचा दावा या जाहिरातींमध्ये करण्यात येतो. पण याच बंगाली बाबाला स्वतःवर संकट घोंघावतंय, याची पुसटशीही कल्पना नव्हती. या बाबा बंगालीला रेल्वे पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. बाबा बंगालीच्या या जाहिरातींमध्ये नोकरी, प्रेमविवाह, संमोहन, पती-पत्नीमधील वाद, काळी जादू, शत्रूंपासून मुक्तता, लॉटरी, कोर्टातले खटले अशा समस्यांवर 100 टक्के हमी देण्याचं आश्वासन दिलं जातं. जाहिरातींद्वारे लोकांकडून पैसा उकळणाऱ्या बाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पैसा उकळणारा बंगाली बाबा गजाआड | Baba Bangali Arrested News
रेल्वे पोलिसांनी मुंबईतल्या रे रोड परिसरात छापा टाकला. मोहम्मद नझीर अंदारी हा व्यक्ती बंगाली बाबा म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली. त्याच्याकडून 15 हजार जाहिरातींचे पोस्टर्सही जप्त करण्यात आले. जाहिरातींमध्ये दिलेल्या फोन नंबरवर कॉल्सच्या माध्यमातून पैसे उकळायचा अशीही माहिती समोर आलीय.
(नक्की वाचा: Thane News: RTO च्या नावाने तुमच्या मोबाईलवर 'हा' मेसेज आलाय? सावधान, बँक खाते होऊ शकते रिकामे !)
भोंदूबाबाचे असे उघडे पडले पितळ?
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई लोकलच्या डब्यांमध्ये अवैध जाहिरातींचे प्रमाण वाढले होते. या जाहिरातींमध्ये भडक दावे करून सर्वसामान्य प्रवाशांना आकर्षित केले जायचे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला असता, यामागील धक्कादायक बाब समोर आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रे रोड परिसरात छापा टाकला आणि मोहम्मद नझीर अंदारीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान समोर आले की, हाच व्यक्ती बाबा बंगालीच्या नावाने जाहिराती देऊन लोकांना लुबाडून त्यांची फसवणूक करत होता.
(नक्की वाचा: Navi Mumbai News: नवी मुंबईकर दहशतखाली, दिवसाही घर बंद करून जगतायेत स्थानिक; नागरिकांनो सतर्क राहा)
15 हजार पोस्टर्स जप्तपोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपीकडून तब्बल 15 हजार पोस्टर्स जप्त करण्यात आले आहेत. या जाहिरातींवर विविध मोबाइल नंबर दिलेले आहेत. जेव्हा एखादी हतबल व्यक्ती आपल्या समस्या सुटतील या आशेने या नंबरवर फोन करायची, तेव्हा बाबा त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि बक्कळ पैसे उकळायचे.
जीवन म्हटलं तर चढ-उतार असणारच, पण अशा लोकांकडे जाऊन समस्यांवर उपाय शोधणे हा पर्याय नाही. नागरिकांनो सतर्क राहा, भोंदू बाबांच्या अशा कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका. कारण यामुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.