Nagpur News : सुमारे ६ दिवसांपूर्वी नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्वालिटी वाईन्स दुकानात चोरी झाली होती. त्यानंतर मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी त्याच सुमारास अवघ्या १०० मीटर अंतरावर चक्क दोन घटना घडल्या आहेत. नूपुर वाईन शॉप आणि ऑरेंज सिटी बिअर शॉपी अशा दोन दारू दुकानांना चोरांनी लक्ष्य केलं आहे.
पश्चिम नागपुरातील या मानकापूर परिसरात चोरांची दहशत हल्ली इतकी वाढली आहे की, आता व्यापारी उघडपणे पोलीस व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एकाच आठवड्यात दारूच्या तीन दुकानांमध्ये झालेल्या तीन मोठ्या चोरीच्या घटनांनी मानकापूर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचा आणि सुरक्षेच्या दाव्यांचा फज्जा उडवला आहे, एवढे मात्र नक्की.
रोख रकमेसह महागड्या दारूचा मोठा साठा घेऊन पसार...
पहिली बाब म्हणजे, या तिन्ही घटनांमध्ये चोरांनी बियर दुकानांना लक्ष्य केले. दुसरी बाब म्हणजे, तिन्ही दुकानं वस्तीच्या आतील भागात नसून चक्क मुख्य रस्त्यावरील आहेत. तिसरी बाब म्हणजे, तिन्ही घटना पहाटे ३:४० ते ४:०० च्या दरम्यान घडल्या आहेत. आणि चौथी बाब म्हणजे तिन्ही वेळा बुरखाधारी चोरांनी शटर तोडून चोरी केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीनुसार, चार बुरखाधारी चोर निर्धास्तपणे आले आणि दुकानाचं शटर तोडले. चोरटे रोख रकमेसह महागड्या दारूचा मोठा साठा घेऊन पसार झाले.
नूपुर वाईन शॉपमधून सुमारे १,८०,००० रुपये रोख
ऑरेंज सिटी बिअर शॉपीमधून २०,००० रुपये रोख
पोलीस ठाण्याला घेराव
आता या भागातील लोक आणि व्यापारी असा सवाल करत आहेत की, चोरांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही का. प्रश्न असा देखील उपस्थित होत आहे की, जर मुख्य रस्त्यावरील दुकानेच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत? पोलिसांची रात्रीची गस्त फक्त कागदावरच मर्यादित आहे का? जर आरोपींना लवकरात लवकर अटक झाली नाही, तर पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा आणि आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.