नाशिकमध्ये सध्या गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं बघायला मिळत असतानाच पंचवटी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारच्या आठवडी बाजारात सायंकाळी वडिलांसोबत भाजी खरेदीसाठी गेलेल्या 19 वर्षीय मुलाचा चार जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकून खून केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत असताना आता नाशिकमधूनही वारंवार गुन्हेगारीची वृत्त समोर येत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सीता गुंफा परिसरात राहणारा सूरज जगत दास वडिलांसोबत गोदाकाठी गेला होता. वडील भाजी खरेदी करत असताना काही अंतरावरच उभ्या असलेल्या सूरजला एका टोळक्याने येऊन धक्काबुक्की करत पैशांची मागणी केली. सुरजने पैसे देण्यास नकार दिला असता टोळक्यातील एकाने त्याच्या डाव्या बाजुला पोटात चाकू खुपसला आणि हे टोळके फरार झाले.
नक्की वाचा - धक्कादायक! मुलावर उपचार करा, बाप सांगत राहीला, लेकाचा बेडवरच तडफडून जीव गेला
गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या सुरजला वडिलांनी नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले असता उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पंचवटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, आरोपींच्या शोधासाठी पोलीसांची पथके रवाना झाली असून आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे.