- नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीत एका तरुणीची तिच्या पहिल्या प्रियकराने चाकूने हत्या केली आहे
- वैष्णवी आवारे दुसऱ्या तरुणाशी लग्न करणार असल्याने साहिल लाव्हारे आला राग
- वादाच्या दरम्यान वैष्णवीच्या होणाऱ्या नवऱ्याने फोनवरून दोघांच्या संभाषणाचा शेवटचा भाग ऐकला होता
- प्रांजली कुलकर्णी, प्रतिनिधी
Nashik Exclusive News: नाशिकमधील इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीत शुक्रवारी (17 जुलै) रात्री 10.30 वाजेच्या सुमारास झालेल्या वैष्णवी अनिल आवारे या तरुणीच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. वैष्णवी दुसऱ्या तरुणाशी लग्न करणार असल्याच्या रागातून तिचा पहिला प्रियकर साहिल लाव्हारे यानेच तिची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. वैष्णवीचा काटा काढल्यानंतर आरोपी साहिलने झाडाला गळफास घेत स्वतःचेही आयुष्य संपवले.
होणाऱ्या नवऱ्याने फोनवर ऐकले शेवटचे संभाषण
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही इंदिरानगर परिसरात एका पीजीमध्ये (Paying Guest)राहत होती. तिचे लग्न ठरले होते. शुक्रवारी (17 जुलै) रात्री तिचा पहिला प्रियकर साहिल लाव्हारे याच्यासोबत तिचा जोरदार वाद झाला. हा वाद सुरू असताना वैष्णवीच्या होणाऱ्या नवऱ्याने फोनवरून त्यांचे संभाषण ऐकले होते. दोघांमधील वादाचे रूपांतर थेट हत्येमध्ये झाले. राग अनावर झालेल्या साहिलने वैष्णवीवर चाकूने सपासप वार केले.
'वैशूला आज संपवलं...'
वैष्णवीची हत्या केल्यानंतर 'वैशूला आज संपवलं' असे उद्गार साहिलेने काढले होते. त्याचे हे वाक्य वैष्णवीच्या होणाऱ्या नवऱ्याने फोनवर ऐकले. एवढेच नव्हे तर अत्यंत निर्लज्जपणे त्याने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला फोनवर विचारले की, "तू कुठे आहेस, तुला इथे पोहोचायला किती वेळ लागेल?" या फोन कॉलनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
(नक्की वाचा: Nashik News: नाशिक हादरले! पीजीत राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात हत्या, आरोपी तरुणाचेही टोकाचे पाऊल)
पहाटे पोलिसांना आढळला आरोपी प्रियकराचा मृतदेह
शुक्रवारी रात्री वनसंपदा सोसायटीच्या गार्डनमध्ये वैष्णवीचा मृतदेह सापडल्यानंतर इंदिरानगर पोलिसांनी तातडीने आरोपी साहिलचा शोध सुरू केला होता. पोलीस त्याचा माग काढत असतानाच शनिवारी (18 जुलै) पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका झाडाला साहिल लाव्हारे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. वैष्णवीची हत्या केल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
वेड्या प्रेमाचा रक्तरंजित अंत
वैष्णवी आणि साहिल यांच्यात आधी प्रेमसंबंध होते. पण वैष्णवी दुसऱ्या मुलाशी लग्न करणार असल्याचे समजल्यामुळे साहिल प्रचंड संतापला होता. याच रागातून आणि वेड्या प्रेमातून त्याने आधी वैष्णवीचा जीव घेतला आणि नंतर स्वतःचाही अंत केला. एकाच रात्रीत घडलेल्या या हत्येच्या आणि आत्महत्येच्या सत्रामुळे इंदिरानगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोन्ही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world