
महिलांवरिल अत्याचार, त्यांची छेडछाड याच्या घटना राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. राज्यात महिला खरोखर सुरक्षित आहेत का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा शहरात महिला अत्याचाराच्या घटनां गेल्या काही महिन्यात घडल्याचे समोर आले आहे. त्यात अशीच एक धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात घडल्यानं सर्वच जण हादरून गेले आहेत.
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. माझ्या सोबत फोनवर बोल यासाठी काही तरुण एका अल्पवयीन तरुणीच्या मागे लागले होते. आपल्या बरोबर तू बोललचं पाहिजे असं ते तिच्यावर दबाव टाक होते. ऐवढेच नाही तर ते तिला सतत बोलण्यासाठी धमकावत होते. तिच्यावर दबाव टाकत होते. या धमकीला ती तरुणी घाबरली. तो दबाव तिला असह्य झाला. शेवटी या 17 वर्षाच्या तरुणीने गळफास घेत आपलं जिवनच संपवलं आहे. मंगरूळपीर तालुक्यातील अंबापूर इथं ही घटना घडली.
या प्रकरणी मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या पालकांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. त्यांनी या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय आतिश चवरे, अमोल टोणे यांना तरुणांना तक्रारीनुसार अटकही करण्यात आली आहे. यातील एक अनोळखी व्यक्ती फरार असून पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. त्याला लवकर शोधून काढावे अशी मागणी पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांनी केली आहे.
गेल्या सहा महिन्या पासून पीडित युवतीला फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकला जात होता. शिवाय तिला धमकी दिली जात होती. आरोपींनी 'तू आमच्याशी फोनवर बोल, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना व भावाला ठार मारू,' अशी धमकी ते तिला सतत देत होते. पीडित मुलीच्या वडिलांना जातिवाचक शिवीगाळ ही करण्यात आली होती. या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने दोन दिवसा पूर्वी आत्महत्या केली. जिल्ह्यातील अशा प्रकारची गेल्या महिन्या भरातली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world