सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील एका प्रसिद्ध विद्यापीठात मुलीची छेड काढणाऱ्या हुल्लडबाजाला मुलीच्या वडिलांनी चांगलाच धडा शिकवला. गेल्या 15 दिवसांपासून एका विद्यार्थिनीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या दुसऱ्या कॉलेजच्या तरुणाला त्यांनी कॅम्पसमध्येच गाठून चोप दिला. या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनाच्या सुरक्षेचा बोजवारा उडाला असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात चक्क विद्यापीठाच्या आवारातच विद्यार्थिनी सुरक्षित नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
वडिलांचा संताप आणि कॅम्पसमध्ये राडा
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण पीडित विद्यार्थिनीला गेल्या 2 आठवड्यांपासून ऑनलाईन माध्यमातून सतत त्रास देत होता. या छळाला कंटाळून तरुणीने शेवटी आपल्या कुटुंबाला या प्रकाराबद्दल माहिती दिली.
तो तरुण पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात आला असल्याची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी त्याला तिथेच रंगेहाथ पकडले. संतापलेल्या पित्याने तरुणाला जाब विचारला असता त्यांच्यात मोठी झटापट झाली. यावेळी मुलीच्या वडिलांनी त्या हुल्लडबाजाला कॅम्पसमध्येच लोळवले. हा सर्व हायव्होल्टेज ड्रामा पाहून परिसरात मोठी गर्दी जमली होती.
( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोची नवी गुगली! आता स्टेशनमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बदलावी लागणार सवय )
विद्यापीठ प्रशासनाचा ढिसाळ कारभार
या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, पीडित कुटुंबाने या छळाबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे आधीच लेखी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाकडून या गंभीर विषयावर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत, असा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. तक्रार करूनही जर कारवाई होत नसेल, तर प्रशासनाला नेमकं काय साध्य करायचं आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळेच अखेर एका वडिलांना स्वतः कायदा हातात घेण्याची वेळ आली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोचा धमाका! कॅम्प, पुलगेटमार्गे थेट उंड्री गाठता येणार, वाचा कुठून जाणार ट्रेन )
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
बाहेरील कॉलेजचा विद्यार्थी एका नामांकित विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सहजपणे शिरून मुलींची छेड काढतोच कसा, असा प्रश्न आता विचारला जात आहे. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अशा हुल्लडबाजांचे धाडस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. या घटनेनंतर आता विद्यापीठ प्रशासन आपली सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करणार की पुन्हा असेच प्रकार घडत राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.