- पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे आणि सोमर्डी भागात लग्नातील जेवणानंतर 62 हून अधिक लोकांना विषबाधा झाली
- रबडी, भाजी, गुलाबजाम आणि बटाटावड्याचा समावेश असलेल्या जेवणानंतर काही तासांत पाहुण्यांना उलट्या-जुलाबाचा त्रास
- गंभीर परिस्थिती असणाऱ्या 28 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
- अजिंक्य धायगुडे, प्रतिनिधी
Purandar News: पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे आणि सोमर्डी परिसरात एका लग्नसमारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नातील जेवण केल्यानंतर काही वेळातच 62 हून अधिक जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आरोग्य यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे.
28 पाहुण्यांची प्रकृती गंभीर
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लग्न सोहळ्यामध्ये रबडी, भाजी, गुलाबजाम आणि बटाटावडा अशा पदार्थांची मेजवानी होती. पण हे पदार्थ खाल्ल्यानंतर काही तासांतच पाहुण्यांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. रुग्णांची वाढती संख्या पाहून बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गराडे उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर त्रास होत असलेल्या 28 रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर काहींना सासवड येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. 12 रुग्णांवर आयव्हीद्वारे उपचार करण्यात आले असून उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
(नक्की वाचा : Pimpri-Chinchwad News: सावधान! भाडेकरू ठेवलाय? पिंपरी-चिंचवडमधील 38 घरमालकांवर पोलिसांची मोठी कारवाई, एक चूक भोवली)

Photo Credit: NDTV Marathi
रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमर्डी येथील जनहितार्थ हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक 31 रुग्ण उपचार घेत आहेत, त्यापैकी 20 जण ॲडमिट आहेत. मोरया हॉस्पिटलमध्ये 10, युनिटीमध्ये 2 आणि नाझरे सुपेतील ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यात इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने गावात घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. किरकोळ लक्षणे असलेल्या 12 नागरिकांवर त्यांच्या घरीच उपचार करण्यात आले आहेत. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world