समाधान कांबळे, प्रतिनिधी
कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी आपलं आयुष्य संपवतात. मात्र हिंगोलीतील एका तीस वर्षांच्या तरुणाने लग्न जमत नसल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'शेतकरी नवरा नको ग बाई' म्हणत अनेकदा मुलगी शेतकऱ्याच्या घरातील स्थळ नाकारतात. त्यातून गावातील तरुणाई निराशेच्या गर्तेत सापडल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील हिंगोलीत शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाची समस्या गंभीर बनत चालली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या लग्नसराईचा मोसम सुरू झाला आहे आणि अनेक जण लग्न जमवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र हिंगोलीच्या कळमनुरी येथील गजानन व्यवहारे या तरुणाची तिसी ओलांडली तरी देखील लग्न जमत नव्हतं. या तरुणाने आई वडिलांकडे लग्नाचा ससेमीरा लावला होता. वारंवार तो आई-बाबांना लग्न करून देण्याची मागणी करीत होता. आई-वडील देखील मुलाच्या लग्नासाठी धावपळ करीत होते. ते ठिकठिकाणी जाऊन विवाह स्थळ पाहत होते. मात्र विवाहाचा योग जुळून येत नव्हता. लग्न जमत नसल्याने अस्वस्थ झालेल्या गजानन व्यवहारे या 30 वर्षीय शेतकरी युवकाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली.
नक्की वाचा - Gadchiroli Crime : आज पोलीस ठाण्यात ड्यूटी, तत्पूर्वीच CRPF जवानाने आयुष्यच संपवलं!
मराठवाड्यामध्ये खरंतर शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न हा गंभीर बनत चालला आहे. मुलाकडे शेती हवी, मात्र शेतकरी मुलगा नको अशी भावना मुलींच्या कुटुंबाची आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक तरुणांची तिशी ओलांडूनही लग्न जुळत नाहीये. त्यामुळे युवकांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागत आहे.