- मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील मैनाई गावात 32 वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू
- मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर हत्या करण्याचा आरोप केला आहे
- प्राथमिक तपासात ही घटना आत्महत्या असल्याचे समजत असले तरी पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे कारण समजेल
सर्वांचेच काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एकाच घरात आईसह दोन चिमुरड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत. पण या मृत्यूचे गुढ मात्र वाढत चालले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या या निकषावर अजून ही पोलीस पोहचले नाहीत. जोपर्यंत पोस्टमार्टम रिपोर्ट हाती येत नाही तोपर्यंत पुढची दिशा ठरणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण ज्या महिलेचा यात मृत्यू झाला आहे तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वेळण लागण्याची शक्यता आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रहली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मैनाई गावात घडली आहे. एका 32 वर्षीय महिलेसह तिच्या दोन चिमुल्या मुलांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत. पोलीस या प्रकरणाकडे प्राथमिकदृष्ट्या आत्महत्या म्हणून पाहत आहेत. असं असलं तरी, मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी हा सुनियोजित खून असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पण त्यात आणखी एक अँगल पुढे आला आहे. तो अँगल अनैतिक संबंधांचा आहे.
मृत रजनी (32) हिचा भाऊ रवींद्र लोधी याने आरोप केला आहे की, रजनीचा पती राजेश याचे त्याच्या मोठ्या भावजयीसोबत अवैध संबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. यावादातून दोघांची नेहमी भांडणं होत होती. या भांडणातूनच रजनी आणि तिच्या दोन मुलांची ऋषभ (5) आणि राम (2) हत्या करण्यात आल्याचा आरोप रजनीच्या माहेरच्यांनी केला आहे. ज्यावेळी आपल्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचे रजनीला समजले तेव्हा पासून ती त्याचा विरोध करत होती. पण बदल्यात तिलाच मारहाण होत होती असं तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात आहे. रजीनीने आधी मुलांना फासावर लटकवलं नंतर स्वत: फास लावून घेतला. घटनेच्या वेळी घरात 10 सदस्य असताना कोणालाच मुलांच्या रडण्याचा आवाज कसा आला नाही? तसेच मृतदेह पोलिसांना कळवण्यापूर्वीच खाली का उतरवले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रहली एसडीओपी प्रकाश मिश्रा यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. सध्या पोलिसांनी घटनास्थळ सील केले आहे.
वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. कारण हा अहवाल या केसमध्ये महत्वाचा ठरणार आहे. डॉ. बसंत नेमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरावरील काही खुणा 'हायपोस्टॅसिस'मुळे असू शकतात. पोलीस अधीक्षक लोकेश कुमार सिन्हा यांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले आहे. 32 वर्षीय महिला आणि दोन निष्पाप बालकांच्या मृत्यूचे गूढ आता पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच उकलणार आहे. त्यानंतर ही हत्या आहे की आत्महत्या हे समोर येणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world