Nashik Ashok Kharat Case : अशोक खरात याच्या कृत्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचारासह त्याच्याविरोधात अनेक आर्थिक अपहाराचे आरोप केले जात आहेत. बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरातनं अनेक ठिकाणी भुखंड घेत माया जमवल्याच सांगितलं जात आहे. त्यानं आपण आजोळ ही सोडलं नसल्याचं समोर येत आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या काकडी गाव खरातच आजोळ असून येथे देखील त्यानं आपल्या काही जवळच्या व्यक्तींच्या नावे कोट्यवधींची भुखंड घेतल्याची माहिती समोर येत आहे. भोंदूबाबानं या जमिनी दुसऱ्याच्या नावे घेऊन त्याचं मुखत्यार पत्र करुन घेत सर्व अधिकार आपल्या परिवारात ठेवल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास हे २५ एकरांचे भूखंड असल्याचं सांगितलं जात आहे.
घातपात करीत भावाचा जीव घेतला....
नाशिकच्या विलास जाधव या एका शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने बलात्काराचे आरोप असलेल्या कॅप्टन अशोक खरातवर गंभीर आरोप केले आहेत. नाशिकच्या गौळाणे परिसरात जाधव कुटुंबीयांची 81 गुंठे म्हणजे 2 एकर 1 गुंठा जागा खरातने पोलिसांना हाताशी धरून बळकावली होती असा आरोप विलास जाधव यांनी केला आहे. यासोबतच जागेच्या व्यवहाराबाबत भाऊ कैलास जाधव न्यायालयात धाव घेऊन स्टे ऑर्डर आणणार असल्याचं कळताच त्यापूर्वी 12 डिसेंबर 2022 ला त्याचा खरातने घातपात करत जीव घेतल्याचं विलास जाधव यांनी म्हटलं आहे. अंबड पोलीस स्टेशनला याबाबत तक्रारही दाखल केली होती. मात्र पोलिसांनी घातपात वगैरे काहीही नाही, कॅप्टनचा संबंध नसल्याचं सांगत प्रकरण मिटवले असा विलास जाधव यांनी आरोप केला आहे. दरम्यान याबाबत सगळे पुरावे घेऊन आपण एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं विलास जाधव यांनी म्हटलं आहे. पोलीस या आरोपांची शहानिशा करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
५ महिन्यांपासून मुलगा बेपत्ता...
यानंतर नाशिकमधून आणखी एक तक्रार समोर आली आहे. नाशिकच्या पाथर्डी वाडीचे रान परिसरातील शिवाजी ढगे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. कॅप्टन अशोक खरातला जमीन विकली आणि त्या दिवसापासून माझा मुलगा बेपत्ता झाल्याचं त्यांनी शिवाजी ढगे यांनी सांगितलं. 5 महिन्यांपासून मुलाचा शोध लागत नसल्याने कुटुंब चिंतेत असून नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार देण्यात आली होती. यासंदर्भात त्यांनी वृत्तपत्रात बेपत्ता झाल्याची नोटीसही दिली होती.