Ulhasnagar Crime News Today: उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-4 यांनी अमली पदार्थांच्य तस्करी विरोधात मोठी कारवाई केलीय. पोलिसांनी 9 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना उल्हासनगर-1 परिसरातील अमरडाय कंपनी बाहेरील ओसाड रस्त्यावर संशयास्पद रिक्षा दिसून आली. पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली असता,त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.
गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले
या कारवाईत रिक्षाचालक हिदायतुल्ला बिसमिल्ला शेख (वय 51,अंबरनाथ),तसेच ओडीशा राज्यातील बिकास बिकरम रणबैसा (वय 26) आणि सुधीर धरूबा रणबैसा (वय 27) या दोघांना अटक करण्यात आली.पोलिस तपासात आरोपी उडीसाहून रेल्वेने गांजाच्या बॅगा घेऊन आले होते.वत्यानंतर हा माल रिक्षातून अंबरनाथ परिसरातील बाबू खान नावाच्या व्यक्तीकडे विक्रीसाठी नेला जात होता.यावेळी गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले.
नक्की वाचा >> Pune News: पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत..इंदापूरच्या ओंकारने सायकलवरून चक्क केदारनाथ गाठलं, थक्क करणारा Video
9 लाख 35 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून तब्बल 21.584 किलो गांजा, तीन मोबाईल फोन आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा असा एकूण 9 लाख 35 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेल्वेमार्गे अमली पदार्थांची तस्करी किती सहजपणे होत आहे, याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा रेल्वेतून शहरात आणला गेला.यामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणा आणि तपासणी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास उल्हासनगर गुन्हे शाखेकडून सुरू आहे.या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का,याचा शोध पोलीस घेत आहेत.