
लग्नानंतरही विवाहित व्यक्ती त्याच्या प्रियकर/प्रेयसीला न विसरण्याचे प्रकार सातत्यानं उघड होत आहेत. या प्रकारात काही वेळा गुन्हेगारी घटना घडतात. नवऱ्याला निळ्या ड्रममध्ये मारणारी उत्तर प्रदेशाच्या मेरठची 'मुस्कान' किंवा हानिमूनला नवऱ्याची हत्या करणारी इंदूरची 'सोनम' ही यावर्षीची प्रकरणं अजून कुणीही विसरलेलं नाही. ही प्रकरणं ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये प्रियकराच्या प्रेमात बुडालेल्या विवाहित महिलेनं नवऱ्याची हत्या केली नाही. पण, त्याच्यासमोर असा प्रस्ताव ठेवला की त्यामुळे सर्वजण चक्रावले आहेत.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका विवाहित महिलेने गावाच्या पंचायतीत असा प्रस्ताव ठेवला, तो ऐकून तिचा पती, पंचायतीचे सदस्य आणि गावकरी थक्क झाले.
या महिलेने स्पष्टपणे सांगितले की, तिला महिन्यातील 15 दिवस तिच्या पतीसोबत आणि 15 दिवस तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे. ही महिला आतापर्यंत 10 वेळा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे, आणि तिचा हा वादग्रस्त प्रस्ताव आता परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
( नक्की वाचा : Nikki Murder Case : 'बाबांनी आईला जिवंत जाळलं' मुलाचा Video Viral, धक्कादायक प्रकारामुळे खळबळ )
10 वेळा प्रियकरासोबत पळाली महिला
मिळालेल्या माहितीनुसार, अजीम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या तरुणीचे लग्न सुमारे दीड वर्षांपूर्वी शेजारच्या गावातील एका तरुणाशी झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनीच तिचे टांडा परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर, गेल्या 1 वर्षात महिला 10 वेळा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. प्रत्येक वेळी, पंचायत किंवा पोलिसांच्या मदतीने तिला तिच्या पतीच्या घरी परत आणले. पण तिनं प्रियकराला सोडलं नाही. ती सातत्यानं त्याच्या संपर्कात होती. इतकंच नाही तर पळून जात होती.
नुकतीच, आठ दिवसांपूर्वी ही महिला तब्बल दहाव्यांदा तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. त्रासलेल्या पतीने अजीम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला तिच्या प्रियकराच्या घरातून ताब्यात घेऊन पतीच्या ताब्यात दिले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती पतीच्या घरी फक्त एक रात्र थांबली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा प्रियकराकडे परत गेली.
15-15 चा प्रस्ताव
पत्नी सतत पळून जात असलेल्या नवऱ्यानं शेवटचा प्रयत्न म्हणून पंचायतीकडं धाव घेतली. . पंचायतीत पतीने हात जोडून पत्नीला घरी परत येण्याची विनंती केली, पण महिलेने सर्वांना धक्का देणारा प्रस्ताव ठेवला. ती म्हणाली, 'मला दोघांसोबत राहायचे आहे. महिन्याचे 15 दिवस पतीच्या घरी आणि 15 दिवस प्रियकराच्या घरी घालवेन.' या विधानाने पंचायतीत शांतता पसरली.
निराश पतीने शेवटी हार मानली आणि हात जोडून म्हणाला, 'मला माफ कर, आता तू तुझ्या प्रियकरासोबतच राहा.' यानंतर पतीने पत्नीला तिच्या प्रियकराच्या घरी सोडून दिले आणि स्वतः घरी परत आला.
परिसरात चर्चेचा विषय बनलेली घटना
महिलेचा हा अनोखा प्रस्ताव आणि पतीची प्रतिक्रिया आता संपूर्ण रामपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. या प्रकारच्या घटनांमध्ये पती-पत्नी समेट किंवा विभक्त होण्याचा मार्ग स्वीकारतात. पण, 15-15 दिवसांचा फॉर्म्युला, पूर्वीही कधीही ऐकला नसल्याचं गावातील ज्येष्ठांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world