मनोज सातवी, प्रतिनिधी
Virar Crime : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून तसेच, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावातून गुरे चोरून नेणाऱ्या (गो तस्करी करणाऱ्या) टोळीचा अखेर गावकऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. विरार पूर्वेच्या शिरसाड फाटा येथे गावाकऱ्यांनी गो तस्करांना रंगेहात पकडलं. हे गो तस्कर एका छोट्या कारमध्ये दाटीवाटीने चार जनावरे कोंबून घेऊन जात होते. या कारमधून एक गाय आणि तीन वासरांना बाहेर काढून चोरट्यांना नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या जनावरांना इंजेक्शनमधून गुंगीचे औषध देऊन चोरून नेण्यात येत होतं.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड भागातून एक भरधाव संशयस्पद कार जात होती. यावेळी त्या कारची एका वाहनाला धडक लागली. त्या धडकेत ती कार थांबली असताना त्यात दाटीवाटीने चार जनावरे कोंबून भरली होती. याची माहिती येथील स्थानिकांना मिळताच नागरिक घटनास्थळी जमा होऊन कारची तपासणी केली असता हे प्रकरण उघडकीस आले. त्यावेळी संतप्त नागरिकांनी या जनावरे चोरणाऱ्या अब्दुल वाहिद आणि बिलाल शेख या चोरट्यांना पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं. मांडावी पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर गायीसह वासरांना शिवणसई येथील गोशाळेत नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
नक्की वाचा - Kalyan News : महिला पोलिसाला चावली, मराठी आणि परप्रांतीय कुटुंबामधील वादाने गाठलं टोक
यापूर्वी सुद्धा खानिवडे गावातील भरवस्तीतून गुंगीचे इंजेक्शन देऊन कारमधून गुरांना चोरून नेण्याचा प्रकार समोर आला होता. याबाबतचे वृत्त NDTV मराठीने प्रसारित केलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे.