यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Crime News Today : पत्नीने अनैतिक संबंधांबाबत जाब विचारल्याच्या रागातून पतीने स्वतःच्या घरालाच आग लावल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहत येथे घडली.या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले, तर घरात असलेल्या तीन पाळीव मांजरींचा होरपळून मृत्यू झाला.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन मांजरीच्या पिल्लांची सुखरूप सुटका केली.
आरोपीचं एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय
या प्रकरणी 36 वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार दयानंद आनंता कसबे (38) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना 9 जुलै रोजी घडली. तक्रारीनुसार,आरोपीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.त्यांच्या मुलाने आरोपीला संबंधित महिलेसोबत पाहिल्यानंतर या प्रकाराबाबत त्याने त्याच्या आईला सांगितलं. त्यानंतर तक्रारदाराने संबंधित महिलेकडे जाऊन जाब विचारला आणि घरी परतल्यानंतर पतीलाही याबाबत विचारणा केली.
नक्की वाचा >> Ahilyanagar News: श्रीरामपुरात कडकडीत बंद! त्या हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला, नंतर जे घडलं..
तीन पाळीव मांजरींचा आगीत होरपळून मृत्यू
यामुळे पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला.या वादाच्या रागातून दयानंद कसबे याने स्वतःच्या घराला आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.मात्र, तोपर्यंत घरातील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले होते.तसेच घरात असलेल्या तीन पाळीव मांजरींचा आगीत होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घरातून दोन मांजरीच्या पिल्लांना सुखरूप बाहेर काढले. या प्रकरणाचा पुढील तपास पर्वती पोलीस करत आहेत.आरोपी फरार झाला आहे.