
- सोनमला प्रियकर राज कुशवाहासोबत राहायचे होते, पण कुटुंबाने राजा सोबत लग्न लावून दिले.
- लग्नानंतर हनीमून दरम्यान राजा गायब झाला
- सोनमने राजाचा खून करण्यासाठी सुपारी दिली होती
मध्य प्रदेशातील इंदूर येथील 24 वर्षीय सोनम रघुवंशी या नवविवाहितेने तिचा नवरा राजा रघुवंशी याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोनमला आपला प्रियकर राज कुशवाहासोबत राहायचे होते, मात्र कुटुंबाने तिचे लग्न राजासोबत लावून दिले. यामुळे संतापलेल्या सोनमने पतीचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली आणि हा भयंकर कट रचला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नक्की वाचा : सोनमनं 'मंगळ दोष' दूर करण्यासाठी हत्या केली? राजाच्या वडिलांचा गंभीर आरोप, म्हणाले...
प्रियकरासाठी रचला कट
सोनम आणि 29 वर्षीय राजा यांचं 11 मे रोजी इंदूरमध्ये लग्न झालं होतं. सोनमच्या कुटुंबाचा व्यवसाय असून तिचा प्रियकर राज हा सोनमच्या कंपनीत कामाला होता. अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या राजवर सोनम अशी काही भाळली होती की तिने त्याच्यासाठी वाट्टेल ते करण्याची शपथ घेतली होती. सोनम आणि राजचे प्रेमसंबंध तिच्या आईला पसंत नव्हते. आपल्या समाजातीलच मुलाशी लग्न करायला हवंस असा तिने तिच्यावर दबाव टाकला होता. यामुळे सोनम भडकली होती, दबावामुळे तिने लग्नाला होकार दिला मात्र त्याचवेळी तिने आईला धमकी दिली होती. “तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केलीत ना, आता याचे परिणाम तुम्हा सगळ्यांना भोगावे लागतील. बघा मी त्याचे (राजा रघुवंशीचे) काय हाल करते ते.” ही धमकी सोनमने तिच्या आईला दिली होती. मात्र त्यावेळेला ती असं काही करेल हे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते.
हनीमूनला गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला, सोनम गायब झाली
लग्नानंतर सोनम आणि राजा हनीमूनसाठी मेघालयला गेले. 23 मे रोजी नोंग्रीआट गावातील होमस्टेमधून बाहेर पडल्यानंतर दोघेही गायब झाले होते. सुरुवातीला हे दोघेही बेपत्ता झाले असावे आणि दोघांच्या जीवाचे बरेवाईट झाले असावे असे वाटत होते. मात्र 2 जून रोजी राजाचा मृतदेह गावापासून 20 किमी अंतरावर सापडला. पोलीस तपासात सोनमने आपला प्रियकर राज आणि त्याच्या तीन साथीदारांसह मिळून हा खून केल्याचे उघड झाले.
नक्की वाचा : सोनमनं थकल्याचं नाटक केलं, हळू चालत होती, आणि एकदम ओरडली, 'त्याला मारा'
सुपारी देऊन राजाला संपवले
पोलिस सूत्रांनुसार, सोनमने खून करण्यासाठी 20 लाख रुपयांची सुपारी दिली होती. तिने आकाश राजपूत (19), विशाल सिंह चौहान (22) आणि आनंद कुर्मी या तिघांना सुपारी दिली होती. हे तिघे नवविवाहित जोडप्याला बंगळुरू येथे भेटले आणि तिथून मेघालयला गेले. राजाचा खून केल्यानंतर, सोनम आणि राजने हॉटेलमध्ये मौजमजा केली होती आणि त्यानंतर ती इंदूरला परतली होती. रविवारी रात्री सोनमने उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील नंदगंज पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केलं. त्याच दिवशी तिन्ही मारेकऱ्यांना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. सोनमचा प्रियकर राजलाही अटक करण्यात आली.
राजा रघुवंशीचा मोठ्या भाऊ, विपिनने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, सोनमने तिच्या प्रेमप्रकरणाबाबत आईला सांगितलं होतं, पण आईने तिला राजाशी लग्न करण्यास भाग पाडलं. “सोनमने धमकी दिली होती की, ती काहीतरी भयंकर करेल, पण ती खून करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं,” असं विपिन म्हणाला. संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणातील नवनव्या बाबी रोज उजेडात येत आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पोलीस सोनम आणि सगळ्या आरोपींविरोधात सबळ पुरावे जमा करण्याचे काम करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world