- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पॅनल क्रमांक 29 मध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटा वाद झाला आहे
- शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांनी भाजपवर पैसे वाटप करण्याचा गंभीर आरोप केला आहे
- भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आरोपांना खोटे म्हटले आहे.
अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार शिंगेला पोहचला आहे. डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 29 मधून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढविणारे नितीन पाटील यांनी भाजपचे कार्यकर्ते पैसै वाटप करीत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेना शिंदे गटाचा आरोप खोटा असून आमचे कार्यकर्ते प्रचार पत्रके वाटत होते. त्याच वेळी त्यांच्या खिशात पैसे कोंबून त्यांना मारहाण केली असा पलटवारकेला आहे. ही दादागिरी दडपशाही आम्ही सहन करणार नाही असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला आहे. यावरून कल्याण डोंबिवलीतलं वातावरण चांगलेच तापले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेना शिंदे गटाची युती असताना केवळ पॅनल क्रमांक 29 मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत आहे. पॅनल क्रमांक 29 अ मधून भाजपच्या कविता म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेच्या रुपाली म्हात्रे, ब मधून भाजपच्या आर्या नाटेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या रंजना पाटील, क मधून भाजपचे मंदार टावरे यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन पाटील हे उमेदवार आहे. ड मधून भाजपच्या अलका म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेचे रवी पाटील उभे ठाकले आहे.
पॅनल क्रमांक 29 मधून शिवसेनेकडून उमेदवार नितीन पाटील यांनी सांगितले की, गेल्या महिन्यापासून त्यांनी भाजपची सगळी पोल खोल केली आहे. त्यामुळे आपल्या पराभवासाठी भाजप नको ते धंदे करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यात दशरत भवनमध्ये भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत होते असा आरोप त्यांनी केला आहे. तीन हजार रुपये प्रत्येक पाकिटात देण्यात आले आहे. भाजपचे विषू पेंडणेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचे कार्यकर्ते पाकीटे वाटत होते असं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्येकाच्या घरात पाकिटे टाकून ते जातात असं ही ते म्हणाले.
सरळ मार्गाने नितीन पाटीलला हरवू शकत नाही. म्हणून असले धंदे करणार का असा प्रश्न त्यांनी केला. एआयच्या माध्यमातून प्रचार करुन मला गुंड ठरविण्यात येत आहे. यांच्याविरोधात कारवाई झाली पाहीजे असं ही ते म्हणाले. त्यांचा एक उमेदवार मंदार टावरे हा यापूर्वीच बाद झाला आहे. त्याला महापालिकेने अहवाल दिला आहे. ते विचारतात. याच्या विरोधात कारवाई करा. महाराष्ट्रात ब्लॅकमेलिंगचे धंदे सुरु आहे. राज ठाकरे यानी सांगितले की, भाजपचे लोक पैसे घेऊन आले. तरी ते लढले. भ्रष्ट लोकांच्या मांडीला माडी लावयची नव्हती म्हणून आम्ही निवडणूक लढवित आहोत असं ही ते म्हणाले.
शिंदे सेनेचे उमेदवार रवि पाटील आणि नितीन पाटील यांच्या कार्यालयाजवळ आमचे भाजपचे कार्यकर्ते प्रचार पत्रके वाटप होते असं भाजपने स्पष्ट केले आहे. त्यांना जबरदस्तीने पकडून मारहाण करण्यात आली.त्यांच्या खिशात जबरदस्तीने पैसे टाकले गेले. हे कृत्य करुन आमचे कार्यकर्ते पैसे वाटप करीत असल्याचा खोटा आळ शिवसेना शिंदे गटाने केला आहे. हा आमच्यावरील अन्याय आहे. याचा आम्ही निषेध करतो. कोणत्याही ऑफीसच्या बाजूला, घराच्या बाजूला कोणीही पैसे वाटू शकत नाही. साधे प्रचार पत्रके वाटू देत नसतील तर हा आमच्याच्यावरचा अन्याय आहे असं ते म्हणाले. ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही. याची तक्रार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचं ते म्हणाले.