मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात आज आघाडीचा निर्णय झाला. मुंबईत वंचित बहुजन आघाडी 62 जागा लढणार आहे. राज्यातील इतर 28 महानगरपालिकेतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसे अधिकार दोन्ही पक्षाने दिलेले आहेत. आज काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी आघाडीचा निर्णय झाला, याला विशेष महत्व आहे. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ‘वंचित बहुजन आघाडी'चे प्रदेशउपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आघाडीची घोषणा केली.
टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, वंचितचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई महिला आघाडी अध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई युवा आघाडी अध्यक्ष सागर गवई उपस्थित होते. मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि वंचित एकत्र लढणार आहेत. त्यात 62 जागा या वंचितसाठी सोडण्यात आल्या आहेत. उरलेल्या सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार असतील. आघाडीची घोषणा झाल्यानंतर मुंबई महापालिकेवर काँग्रेस वंचितची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला गेला. आमची लढाई ही भाजप बरोबर असल्याचं ही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
नक्की वाचा - PCMC Election: ठाकरे गट शरद पवारांना धक्का देणार? 3 प्लॅन सांगत दिला अल्टिमेटम
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची युती ही नैसर्गिक युती आहे. दोन्ही पक्षांची वैचारिक भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संविधानवादी आहेत, संविधानाला अभिप्रेत भारत घडवणे हा दोघांचा विचार आहे. समता, बंधुत्व व सामाजिक न्यायाची भूमिका एकच आहे. दोन्ही पक्ष संवैधानिक मुल्यांशी तडजोड करणारे नाहीत. 1998 व 1999 च्या निवडणुकीत दोन्ही पक्षात आघाडी झाली होती. आता पुन्हा 25 वर्षांनी दोन पक्ष एकत्र आले आहेत. या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागला पण आजपासून नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. हा आकड्यांचा खेळ नसून विचारांचा मेळ आहे, असे सपकाळ म्हणाले.
Maharashtra Politics: महायुतीला मोठा धक्का! राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; जागा वाटपावरुन नाराजी
वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यावेळी म्हणाले की, देश विघातक भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. आघाडीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिले पाऊल टाकले व सुरुवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली होती. मुंबई महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर लढणार आहे, असे पुंडकर यांनी सांगितले. वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा कधीच समाधानकारक होत नसते पण कुठेतरी थांबावे लागते. आघाडीसाठी दोन्ही बाजूकडून सकारात्मक चर्चा झाली. मुंबई महापालिकेसाठी आज आघाडी जाहीर करण्यात आली असून इतर महानगरपालिकेत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेतृत्व सकारात्मक निर्णय घेईल, असे मोकळे म्हणाले.