Election 2026 : वंचितला भोपळाही फोडता आला नाही; मुंबईत वंचित-काँग्रेस आघाडीचा फॉर्म्युला का झाला फेल?

मुंबईकरांनी काँग्रेस वंचितच्या आघाडीला नाकारलंय. काँग्रेस किमान 24 जागांसह मुंबई महापालिकेत आपली उपस्थिती दाखवेल. मात्र वंचितला पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Municipal Corporation Election Results 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. 'वंचित-काँग्रेस'चा हा फॉर्म्युला निवडणुकीत चमत्कार करेल, अशी अपेक्षा वर्तवली जात होती. मात्र, प्रत्यक्ष निकालाने सर्वांनाच धक्का दिला. या युतीत काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले असले, तरी वंचितला साधी एक जागाही जिंकता आलेली नाही. त्यामुळे हा 'राजकीय प्रयोग' मुंबईच्या जमिनीवर पूर्णपणे अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालंय. वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीचा फॉर्म्युला फेल का झाला? (Congress Vanchit Alliance)

मुंबईत वंचित-काँग्रेसचा प्रयोग फसला; काँग्रेसला 24, तर वंचितचा शून्यावर गेम ओव्हर !

महाविकास आघाडीत तीनही पक्षांनी वेगवेगळी वाट धरली. उद्धव ठाकरे बंधू राज ठाकरेंसोबत गेले. शरद पवारांनी अजित पवारांसोबत जुळवून घेतलं. त्यामुळे एकट्या पडलेल्या काँग्रेसनेही प्रकाश आंबेडकरांना जवळ केलं. त्यामुळे काँग्रेसचा कोअर मतदार आणि वंचित फॅक्टर निर्णायक ठरेल अशी चिन्हं होती. मात्र प्रत्यक्षात मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस आणि वंचितची आघाडी सपशेल फेल ठरली आहे. काँग्रेसला समाधानकारक 24 जागांवर विजय मिळाला. तर वंचित बहुजन आघाडीला भोपळाही फोडता आला नाही. 

नक्की वाचा - Congress Mayor in 5 Municipal Corporation: 5 शहरांमध्ये बनणार काँग्रेसचा महापौर, कोणत्या आहेत या महानगरपालिका?

गेल्या काही निवडणुकांपासून वंचित फॅक्टरचा गाजावाजा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सपाटून मार खावा लागलाय. 2019 आणि 2024 दोन्ही वेळेच्या निवडणुकांमध्ये वंचित फॅक्टर काँग्रेस आणि ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरला होता. अनेक जागांवर वंचितच्या उमेदवाराने मोठ्या प्रमाणात मतं फोडली. त्यामुळे वंचितला सोबत घेणं काँग्रेसला योग्य वाटलं. काँग्रेसने वंचित आघाडीसोबत शक्य तितकं जुळवून घेण्याचा प्रयत्न केला.
 
काँग्रेस पक्षाने मोठ्या विश्वासाने वंचित बहुजन आघाडीला 62 जागा देऊ केल्या होत्या. काँग्रेसने काहीसं नमतं घेत 150 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईत वंचित बहुजन आघाडीची फारशी ताकद नसल्याने 16 जागांवर पक्षाला उमेदवारच मिळाले नाहीत. ही गोष्ट समजल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला योग्य वेळी कळवलं नाही. वंचितने त्यांच्या वाट्याला आलेल्या 62 पैकी फक्त 46 जागांवरच उमेदवारी अर्ज भरल्याचं समोर आलं. त्यामुळे काँग्रेसलाही या 16 जागांवर आपल्या इच्छूक उमेदवारांना एबी फॉर्म देऊन रिंगणात उतरवता आलं नाही.

Advertisement

विशेष म्हणजे या 16 जागांपैकी काही ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद असतानाही हा फटका सहन करावा लागला. विशेष म्हणजे वंचितच्या हक्काच्या बालेकिल्यांनाही सुरुंग लागलाय. चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, कुर्ला यांसारख्या वस्त्यांमध्ये वंचितचा प्रभाव चांगलाच ओसरल्याचं दिसून येत आहे.  

वंचित-काँग्रेस आघाडीचा फॉर्म्युला फेल होण्याची महत्त्वाची कारण...

  • दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय दिसला नाही.
  • काँग्रेसने आधी स्वबळाचा नारा दिला होता. मात्र ऐनवेळी वंचितसोबत आघाडीचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांची निराशा झाली. 
  • स्थानिक नेत्यांनी वंचितला जागा सोडण्यास विरोध केला. ज्याचा फटका प्रचारात बसल्यामुळे उमेदवारांचा अपुरा प्रचार झाला.
  • काँग्रेस आणि वंचितने एकत्रित सभा घेणंही टाळलं. 
  • दोन्ही पक्षांचे नेते प्रचारातही एकत्र आले नाहीत. 
  • त्यामुळे काँग्रेस आणि वंचितची युती फक्त नावापुरती राहिली होती..


मुंबईकरांनी काँग्रेस वंचितच्या आघाडीला नाकारलंय. काँग्रेस किमान 24 जागांसह मुंबई महापालिकेत आपली उपस्थिती दाखवेल. मात्र वंचितला पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. 

Advertisement