देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीत भारतीय जनता आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या युतीने स्पष्ट बहुमत मिळवले असून मुंबईचा पुढचा महापौर हा भाजपचा असेल हे स्पष्ट झाले आहे. या विजयानंतर भाजपने मुंबईत मोठा जल्लोष साजरा केला. ही सगळी रणधुमाळी सुरू असताना अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिने निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा: Election Result 2026: मुंबईत 6 जागा जिंकणाऱ्या मनसेचे महाराष्ट्रात किती उमेदवार जिंकले?
महापालिकेने केलेल्या कारवाईचा राग
2020 साली कंगनाच्या घर आणि कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. महापालिकेने कंगनाच्या घराचा आणि कार्यालयाचा काही भाग तोडला होता. ठाकरेंनी वैयक्तिक राग महापालिकेच्या माध्यमातून काढल्याचा कंगनाचा आरोप होता. त्या कारवाईची आठवण करून देत कंगनाने मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंच्या झालेल्या पराभवाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा: Maharashtra Election 2026: महापालिका निवडणुकीत कुणी काय कमावलं? कुणी काय गमावलं? वाचा ठळक मुद्दे
ठाकरेंना महाराष्ट्राने नाकारले
कंगनाने NDTV शी बोलताना म्हटले की "ज्यावेळी अखंड शिवसेना सत्तेत होती, तेव्हा त्यांनी कायदेशीर अधिकारांचा गैरवापर करून माझे घर आणि ऑफिस तोडले होते. मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, मला तुच्छ लेखले आणि महाराष्ट्र सोडण्याची धमकी दिली. मात्र, आज जनतेने त्यांनाच सत्तेतून खाली खेचले आहे. ज्यांनी मला महाराष्ट्र सोडायला सांगितले होते, आज महाराष्ट्रानेच त्यांना नाकारले आहे." कंगनाने म्हटले आहे की महिलांचा द्वेष करणारे, दादागिरी करणारे आणि घराणेशाही चालवणारे 'माफिया' आज जनमताच्या दरबारात पराभूत झाले आहेत. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.