- कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना राष्ट्रवादीने शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून उमेदवारी दिली होती
- निवडणुकीत भाजपच्या मनीषा पाचंगे यांच्याकडून ३०० मतांनी पराभव झाला
- निर्मला नवले यांनी विकासाऐवजी पैसा आणि व्यसनांमुळे निवडणूक प्रभावित झाल्याची टीका केली
कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्यांचे 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सरपंचपद भूषवल्यानंतर त्या पंचायत समितीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूरच्या कारेगाव गणातून उमेदवारी दिली होती. पण त्यांचा पराभव झाला. त्यांना भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी पराभूत केलं. या पराभवानंतर निर्मला नवले समोर आल्या आहेत. त्यांनी आपल्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. शिवाय ज्यांनी मतदान केले त्यांचे त्यांनी आपल्या खास शैलीत आभार ही मानले आहेत. निवडणूक निकालानंतर त्यांचा हा पहिलाच व्हिडीओ आहे. तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यात त्या नाराज असल्याचं दिसतात. सॅड म्यूझिक बॅग्राऊंडला वाजत आहे. त्यात त्या सांगतात, निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरला... पण माझा लढा सुरूच राहील! 300 मतांनी झालेला हा पराभव अनपेक्षित होता, पण ज्या 6577 मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांचा मी मनापासून ऋणी आहे. आज वाईट याचं वाटतंय की विकासाच्या मुद्द्यांपेक्षा ‘पैसा' आणि ‘व्यसनांनी' ही निवडणूक गाजवली, असं म्हणत त्यांनी आपल्या विरोधकांवर टिकेचे बाण सोडले आहेत.
पुढे ते या व्हिडीओत म्हणतात पैशांच्या जोरावर मतं विकत घेता येतील, पण निष्ठा नाही. माझ्या गावातील तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जाताना पाहणं हे कोणत्याही विजयापेक्षा जास्त दुःखद आहे. राजकारण कदाचित खराब असेल, पण लोकांसाठी काम करण्याची माझी जिद्द संपलेली नाही, असं म्हणत पुढच्या काळात आपण राजकारणात सक्रीय राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिवाय आपण कधी पराभूत होवू असं वाटलं नव्हतं. हा पराभव आपल्यासाठी अनपेक्षित म्हणावा लागेल असं ही त्यांनी या व्हिडीओत सांगितलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ एक लाखा पेक्षा जास्त लोकांनी पाहीला आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात कमेंट ही केल्या आहेत. त्यात टिका ही आहे आणि कौतूक ही आहे.
शिरूर तालुक्यातल्या कारेगाव गणातून निर्मला नवले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. सुरूवातीला निर्माला यांची चांगली हवा होती. सोशल मीडियावर त्यांचा असलेला फॅन फॉलोअर्स पाहाता त्या सहज विजयी होतील अशी शक्यता होती. पण सगळ्यांचाच अंदाज चुकला. भाजपच्या मनीषा पाचंगे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत निर्मला नवले यांचा पराभव झाला आहे. मनीषा पाचंगे यांनी या गणातून विजय मिळवला आहे. सोशल मीडियावर महागाड्या गाड्यांचा केलेल्या नवले यांनी व्हिडीओ त्यांना नडला अशी चर्चा सध्या सुरू आहे. साध्या सरपंच असून येवढ्या महागड्या गाड्या तुमच्याकडे कशा असा प्रश्न लोकांनी त्यांना विचारले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world