कल्याणमध्ये कोणाचे 'कल्याण' होणार? शिंदे विरूद्ध दरेकर अटीतटीची लढत

दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारली होती. यावेळी हॅट्रीक करण्याच्या उद्देशाने शिंदे मैदानात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी त्यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे.

Advertisement
Read Time: 4 mins
कल्याण:

कल्याण लोकसभा मतदार संघ पुनर्रचनेत नव्याने तयार झालेला मतदार संघ आहे. या मतदार संघात आता पर्यंत शिवसेनेचाच दबदबा राहीला आहे. पहिल्या निवडणुकीत इथे आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीच्या वसंत डावखरे यांचा पराभव केला होता. तर त्यानंतर झालेल्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांनी बाजी मारली होती. यावेळी हॅट्रीक करण्याच्या उद्देशाने शिंदे मैदानात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी त्यांच्या पुढे मोठे आव्हान उभे केले आहे. शिवाय भाजपच्या अंतर्गत नाराजीमुळे श्रीकांत शिंदे यांचेही डोकेदुखी वाढली होती. त्याचा कितपत परिणाम निकालावर होतो याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

कल्याणमध्ये मतांचा टक्का वाढला 

कल्याण लोकसभेत आता पर्यंत कमी मतदानाची नोंद होत होती. मात्र यावेळी कल्याण लोकसभेत मतांचा टक्का वाढलेला दिसतो. यावे कल्याण लोकसभेत जवळपास 50.12 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2019 साली हीच आकडेवारी अवधी 46.16 टक्के येवढी होती. म्हणजेच यावेळी 3.96 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. कल्याण लोकसभेच्या सहा विधानसभा मतदार संघा पैकी कल्याण पूर्व मतदार संघात सर्वात जास्त मतदान झाले आहे. इथे 52.19 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. इथे भाजपचे गणपत गायकवाड हे आमदार आहे. त्यांचा श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध होता. त्यामुळे इथे वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर सर्वात कमी मतदान हे अंबरनाथ विधानसभेत झाले असून त्याची टक्केवारी 47.06 टक्के येवढी आहे. कल्याण लोकसभेच्या आता पर्यंत झालेल्या तिनही लोकसभा निवडणुकीत मतदानात उत्साह दिसून आलेला नाही. 2009 मध्ये 34 टक्के, 2014 साली 40 टक्के तर 2019 साली 47 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मात्र यावेळी इथे मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात जातो हे पाहावं लागणार आहे. 

Advertisement



प्रचारात कोणत्या मुद्द्यावर भर 

कल्याण लोकसभेत होत असलेले रस्ते, ब्रिज, मेट्रोची सुरू असलेली कामे, रेल्वेची समस्या यासारख्या मुद्द्यांवर श्रीकांत शिंदे यांनी प्रचारा दरम्यान भर दिला होता. मतदार संघात केलेली अडीच हजार कोटींची कामे यावर ही शिंदेंचा भर होता. तर गद्दारांच्या घराणेशाहीला धडा शिकवायचा यावर शिवसेना ठाकरे गटाने भर दिला होता. त्यामुळे ही निवडणूक विकास कामे विरूद्ध घराणेशाही या भोवती फिरली. शिवाय भाजप आमदाराच्या नाराजीचा प्रश्न ही होताच. गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते शिंदेंवर नाराज दिसले. त्यामुळे ते कोणाच्या बाजूनहे होते हा संशोधनाचा विषय ठरला. तर गायकवाड यांच्या पत्नी या उघड पणे ठाकरेंचा प्रचार करताना दिसल्या. त्यामुळे भाजपची आम्हाला कशी साथ मिळत आहे हे ही नियोजनबद्ध पद्धतीने ठाकरे गटाने दाखवून दिले. मनसेचा एक आमदार या मतदार संघात आहे. त्यानेही शिंदे यांना पाठिंबा दिला होता. पण त्यांचेही स्थानिक प्रश्नावरून शिंदेबरोबर मतभेद आहेत. त्याचीही चर्चा निवडणुकी वेळी झाली. 

Advertisement

मतदार संघातील पक्षीय बलाबल 

कल्याण लोकसभेत सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. त्यात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामिण आणि कळवा मुंब्रा मतदार संघाचा समावेश आहे. यात उल्हासनगर, कल्याण पूर्व आणि डोंबिवली मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. तर अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. कल्याण ग्रामिण हा मनसेच्या राजू पाटील यांचा मतदार संघ आहे. तर कळव्यातून जितेंद्र आव्हाड आमदार आहेत. तशी स्थिती पाहाता महाविकास आघाडीची स्थिती कागदावर मजबूत वाटत आहे. शिंदे यांची मदार ही भाजपवर असल्याचे दिसून येते. शिवाय मनसेचीही मदत त्यांना लागणार आहे. तर दरेकर यांची संपुर्ण मदार ही शिवसैनिकांवर आहे. शिवाय कळव्यातून जास्तीत जास्त लिड मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. 

Advertisement

मतदार संघाचा इतिहास काय? 

पहिले हा मतदार संघ ठाणे लोकसभेचा भाग होता. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेत कल्याण हा नवा लोकसभा मतदार संघ तयार झाला. 2009 साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणूकीत इथे शिवसेनेचे आनंद परांजपे विरूद्ध राष्ट्रवादीचे वसंत डावखरे यांच्या चुरशीची लढत झाली होती. या निवडणुकीत आनंद परांजपे यांनी वीस हजाराच्या फरकाने विजय मिळवला होता. मनसेलाही या निवडणुकीत लाखा पेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यानंतर परांजपे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेने मैदानात उतरवले होते. त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर 2019 लाही त्यांनी विजय नोंदवला. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेत फुट पडली. श्रीकांत शिंदे आपल्या वडीलांच्या बरोबर गेले. आता ते तिसऱ्यांदा मैदानात आहेत.