- बॉलिवूड अभिनेता आमीर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सोशल मीडियावर धमकी देण्यात आली आहे
- या धमकीमध्ये आमीर खानच्या तिसऱ्या लग्नाला लव्ह जिहाद म्हणून वर्णन करून विरोध व्यक्त केला आहे
- मुंबई पोलिसांनी अद्याप आमीर खानकडून तक्रार न मिळाल्यामुळे या धमकीची पडताळणी सुरू केली आहे
Amir Khan News: नुकतेच तिसरे लग्न करणाऱ्या बॉलिवूड अभिनेता आमीर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांनी ही पोस्ट आणि ऑडिओ क्लिप शेअर केल्याचा दावा केला जात आहे, जे स्वतःला लॉरेन्स बिश्नोई ग्रुपशी संबंधित असल्याचे सांगत आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की,"आमीर खानसारखे लोक आपल्या देशात 'लव्ह जिहाद'ला खतपाणी घालत आहेत, जे आमच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्ही या माणसाला सहन करणार नाही आणि लवकरच त्याला याचे परिणाम भोगावे लागतील. हे सनातन धर्म आणि देशाच्या विरोधात आहे".
पोलीस करत आहेत पडताळणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना अद्याप आमीर खान किंवा त्यांच्या टीमकडून कोणतीही तक्रार मिळालेली नाही. पोलिसांनाही फेसबुक आणि व्हॉइस नोटच्या माध्यमातून या कथित धमकीची माहिती प्रसारमाध्यमांकडून मिळाली आहे, पोलीस त्याची पडताळणी करत आहेत. आमीर खान यांच्याकडून तक्रार आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेन्स बिश्नोईचा सलमान खानसोबत सातत्याने वाद सुरू आहे. याच दरम्यान आता बिश्नोई गँगकडून पहिल्यांदाच आमीर खानला धमकी देण्यात आली आहे.
आमीर खानच्या तिसऱ्या लग्नाला म्हटले 'लव्ह जिहाद'
सोशल मीडियावर समोर आलेल्या पोस्ट आणि ऑडिओ क्लिपमध्ये आमीर खानच्या तिसऱ्या लग्नाला 'लव्ह जिहाद' म्हटले गेले आहे. त्यात लिहिले आहे की,'आम्ही आमच्या भाऊ, बहीण आणि देशवासीयांना वचन देतो की, जो कोणी अशा लाजीरवाण्या कृत्याला प्रोत्साहन देईल, त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने हाताळू. जे लोक स्टारडमच्या नावाखाली याला प्रोत्साहन देत आहेत, त्यांचा श्वासच आम्ही दाबून टाकू.'
काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी आमीर खानवर टीका करत त्याच्या तिसऱ्या लव्ह जिहाद म्हटले होते. हा वाद वाढल्यानंतर आमीर खानने 'रेडिफ'शी बोलताना सांगितले होते की, ‘माझ्या तीनही लग्नांमध्ये कोणत्याही पत्नीने धर्म परिवर्तन केले नाही, कारण ही लग्न सिव्हिल मॅरेज (नोंदणीकृत विवाह) होती. तिसरी पत्नी गौरी ही हिंदू नसून ख्रिश्चन आहे.'
(नक्की वाचा: Nashik News: नाशिक हादरले! पीजीत राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात हत्या, आरोपी तरुणाचेही टोकाचे पाऊल)
श्रीगंगानगर सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींनाही धमकी
आमीर खानला दिलेल्या धमकीमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगने राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे एका लहान मुलीसोबत घडलेल्या क्रूर घटनेचाही उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले की, 'आम्ही राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये एका निष्पाप मुलीसोबत झालेल्या भयानक गुन्ह्याचाही उल्लेख करू इच्छितो. प्रशासनाने कौतुकास्पद काम केले आहे, पण काही राजकीय नेते काही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा हा पहिला आणि शेवटचा इशारा आहे: त्या निष्पाप मुलीविरुद्धच्या गुन्ह्यात जो कोणी एक टक्का जरी सामील असेल आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटला, तर त्याला आम्ही शिक्षा देऊ.'
(नक्की वाचा: 'गौरी हिंदू नाही तर...'; लव जिहाद आरोपांवर पहिल्यांदाच आमिरने मांडली भूमिका, पहिल्या 2 पत्नींविषयी म्हणाला...)
'जे राजकीय नेते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करणे थांबवावे, नाहीतर त्यांचीही तीच अवस्था होईल जी ते ज्यांना वाचवत आहेत त्यांची होईल. थोडी माणुसकी दाखवा.' या पोस्टमध्ये प्रवेश आणि हिमांशू यांचा 'शहीद' असा उल्लेख करत लिहिले आहे की, ते नेहमी आमच्या हृदयात राहतील. आम्ही तुमचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. आमच्या शत्रूंना चोख प्रत्युत्तर दिले जाईल.