
Rakhee Ex Husband 10 Photos: हिंदी सिनेमा आणि साहित्याच्या विश्वात काही नावे अशी आहेत ज्यांची काळानुसार जादू कमी होत नाही तर साहित्यांसह त्यांचे नाव देखील सर्वदूर पसरते. त्यापैकीच एक नाव म्हणजे गुलजार (Gulzaar). उर्दू, पंजाबी, हिंदी यासह अनेक भाषांमध्ये गुलजार यांनी लिहिलेल्या कविता, गाणी आणि कथा थेट हृदयाला भिडतात. 18 ऑगस्ट 1934 रोजी झेलम (आताचे पाकिस्तान) येथे गुलजार यांचा जन्म झाला. गुलजार आजही त्यांच्या साधेपणाने, संवेदनशीलतेने आणि शब्दांनी लोकांना मोहित करतात. गुलजार यांचे जीवन खोलवर जर कोणी समजू शकले असेल तर ती त्यांची लेक मेघना गुलजार.
प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या मेघना यांनी अनेकदा सार्वजनिकरित्या सांगितलंय की, त्यांच्या वडिलांनी केवळ एक महान लेखक किंवा गीतकाराची भूमिका बजावली नाही तर एक जबाबदार आणि संवेदनशील पालक म्हणूनही ते जीवन जगले आहेत.

गुलजार यांनी 1973 रोजी अभिनेत्री राखी यांच्यासोबत लग्न केले. मुलगी एक वर्षाची असताना राखी आणि गुलजार विभक्त झाले. विभक्त झाल्यानंतर गुलजार यांनी मेघनाचा सांभाळ केला.

जयपूर साहित्य महोत्सव 2019 मध्ये भावुक झालेल्या मेघना यांनी सांगितले की, वडिलांनी कधीही फटकारले नाही, पण शिस्त कायम शिकवली.

गुलजार स्वतः मेघनाला शाळेसाठी तयार करत असत, तिच्या वेण्या बांधून देत असते आणि वेळ काढून मुलीला शाळेतून आणायलाही जात असत. मेघनाला तिच्या आईची कमतरता भासणार नाही, याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली होती.

मेघना यांनी पुढे असेही सांगितलं की, गुलजार यांनी कायम आयुष्य मुक्तपणे जगण्याचे स्वातंत्र्य दिले, पण अभ्यासाशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचा एकच नियम होता, 'तुझा अभ्यास पूर्ण कर, नंतर तुला जे करायचंय ते कर'.

म्हणूनच मेघना आज यशस्वी दिग्दर्शक आहेत. 'राजी', 'छपाक' आणि 'सॅम बहादूर' यासारख्या सिनेमांच्या माध्यमातून मेघना यांनी त्यांचे कौशल्य संपूर्ण जगाला दाखवलंय.

गुलजार यांच्या शायरी, गाणी आणि कवितांमध्ये फाळणीच्या वेदना, दिल्लीचे रस्ते आणि गालिबच्या कलाकृतींचे प्रतिबिंबि दर्शवतात.

1963 साली गुलजार यांनी बिमल रॉय यांच्या 'बंदिनी' या सिनेमामध्ये गीतकार म्हणून कामास सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांनी लिहिलेले 'मोरा गोरा रंग लइले' हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे.

त्यानंतर त्यांनी अनेक एकापेक्षा एक सुंदर गाणी लिहिली. 'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नहीं', 'कजरारे कजरारे' आणि 'छैंया छैंया' यासारख्या गाण्यांद्वारे गुलजार यांच्या लेखणीतील वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या.

गुलजार यांच्या लेखणीप्रमाणे त्यांचा आवाजही दमदार आहे. कित्येक जाहिराती आणि सिनेमांमध्येही त्यांचा आवाज ऐकायला मिळालाय. म्हणूनच आजही जेव्हा ते व्यासपीठावरुन प्रेक्षकांशी संवाद साधत असतात तेव्हा सर्वजण त्यांना शांतपणे ऐकतात

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world