Anurag kashyap on Dhurandhar Movie: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा स्पाय-थ्रिलर चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. जगभरात या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही कथा आणि त्यातील जबरदस्त ॲक्शन प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचे कौतुक प्रेक्षकांसह समीक्षकही करत आहेत. आता या यादीत प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचेही नाव जोडले गेले असून, त्यांनी या चित्रपटाचा सविस्तर रिव्ह्यू दिला आहे.
अनुराग कश्यप यांनी 'लेटरबॉक्सड'वर (Letterboxd) या चित्रपटाची तुलना हॉलिवूडच्या 'द हर्ट लॉकर' आणि 'झिरो डार्क थर्टी' सारख्या ऑस्कर विजेत्या चित्रपटांशी केली आहे. अनुराग यांनी रणवीर सिंहच्या अभिनयाला आपली पसंती दर्शवत त्याचे कौतुक केले आहे. तर दिग्दर्शक आदित्य धरबद्दल ते म्हणाले की, "तो एक निष्ठावान चित्रपट निर्माता आहे. त्याची विचारसरणी स्पष्ट आहे आणि तो इतरांसारखा संधीसाधू नाही."
चित्रपटातील 'या' दोन डायलॉगवर घेतला आक्षेप
चित्रपटाचे कौतुक करतानाच अनुराग यांनी दोन विशिष्ट संवादांना 'प्रोपोगंडा' म्हटले आहे.
- आर. माधवनचा डायलॉग : "एक दिन ऐसा आएगा जब जो देश के बारे में कुछ सोचेगा"
- रणवीर सिंहचा डायलॉग : "ये नया इंडिया है."
अनुराग कश्यप यांच्या मते, हे संवाद जाणीवपूर्वक ठराविक विचारसरणी रुजवण्यासाठी वापरले गेले आहेत. मात्र, चित्रपटाचा दर्जा आणि मेकिंग इतकी उत्कृष्ट आहे की, त्यासाठी ते या संवादांकडे दुर्लक्ष करू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा धुमाकूळ
या चित्रपटाने कमाईचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ग्लोबल बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या अवघ्या 30 दिवसांत चित्रपटाने 1200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर भारतात या चित्रपटाने 750 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
'धुरंधर 2' ची घोषणा
चित्रपटाच्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी लगेचच सिक्वेलची तयारी सुरू केली आहे. 'धुरंधर 2' हा चित्रपट पुढील वर्षी 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये आतापासूनच त्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world