- ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांना निद्रानाशाच्या समस्या आणि मानसिक संघर्षाचा सामना करावा लागला होता
- झोप येण्यासाठी मद्यपान सुरू केले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा वैद्यकीय मदत घेतली
- डॉक्टरांनी नीतू कपूर यांना रात्री झोपेचे इंजेक्शन देऊन दहा दिवस उपचार केले आणि त्यांचा मानसिक आधार दिला
पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतरच्या मानसिक संघर्षावर अभिनेत्री नीतू कपूर यांनी अलीकडेच भाष्य केले. ऋषीजींच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी होते. या काळात त्यांना निद्रानाशाच्या समस्येने ग्रासले होते. ज्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मद्यपानाचा आधार घेतल्याचे प्रांजळपणे कबूल केले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी वैद्यकीय मदत घेतली. रात्रीच्या वेळी झोपेची इंजेक्शन घेण्यापासून ते स्वतःला सावरण्यापर्यंतचा हा प्रवास अत्यंत खडतर होता, असे त्यांनी सांगितले. पती ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्या इतक्या खचल्या होत्या की, त्यांना नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मद्यपान आणि झोपेच्या इंजेक्शनचा सहारा घ्यावा लागला होता.
दुःखाचा डोंगर आणि झोपेची समस्या
एका पॉडकास्टमध्ये बोलताना नीतू कपूर यांनी सांगितले की, एप्रिल 2020 मध्ये ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे कोलमडले होते. पतीच्या जाण्याने त्यांना असा धक्का बसला की कित्येक महिने त्यांना नीट झोपही लागत नव्हती. "मी तासनतास डोळे मिटून पडून राहायचे, पण झोप येत नसे. या अस्वस्थतेमुळे मी मद्यपान करण्यास सुरुवात केली. ड्रिंक घेतल्याशिवाय मला झोप लागणे अशक्य झाले होते," असे नीतू यांनी यावेळी नमूद केले.
डॉक्टरांची मदत इंजेक्शनचा वापर
नीतू कपूर नेहमीच आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहिल्या आहेत. मात्र त्या कठीण काळात त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. घरात राहिल्यावर त्यांना प्रचंड भीती (Anxiety) जाणवू लागली होती. अखेर, त्यांना डॉक्टरांची मदत घ्यावी लागली. डॉक्टरांनी त्यांना एका अनुभवी गायनेकोलॉजिस्टकडे पाठवले. ज्या रात्री 11 वाजता त्यांच्या घरी येत असत. नीतू यांना झोपेचे इंजेक्शन दिले जात असे आणि त्या गाढ झोपेपर्यंत डॉक्टर त्यांच्यासोबत थांबत असत. ही ट्रिटमेंट सलग 10 दिवस सुरू होती.
स्वतःच्या जिद्दीवर सावरले
अनेक जणांनी त्यांना थेरपिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु जोपर्यंत आपण स्वतःहून मानसिकदृष्ट्या खंबीर होत नाही, तोपर्यंत कशाचाही उपयोग होणार नाही, असे नीतू यांना वाटत होते. हळूहळू स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा आयुष्याची नव्याने सुरुवात केली. स्वतःला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. "स्वतःवर विश्वास ठेवल्यास आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो," असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world