
बॉलीवूडमध्ये एक काळ होता जेव्हा करिश्मा कपूरही अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. तिचं लग्न झाल्यानंतर तिने चित्रपटात काम करणे बंद केले आणि कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता. उद्योगपती संजय कपूर याच्यासोबत तिचे लग्न झाले होते आणि या दोघांना दोन मुलेदेखील आहेत. करिश्मा कपूरच्या खासगी आयुष्यावरून त्याकाळी अनेक चर्चा सुरू असायच्या. अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबतच्या तिच्या कथित प्रेमसंबंधांची त्यावेळी चर्चा व्हायची. करिश्माने जेव्हा दिल्लीस्थित संजय कपूरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. करिश्मा आणि संजय कपूर यांचा संसार फार काळ टीकला नाही. दोघांनी घटस्फोट घेत असताना एकमेकांवर जबरदस्त आरोप केले होते. यातील करिश्माने केलेले आरोप हे अधिक धक्कादायक होते.
नक्की वाचा : एका मधमाशीमुळे अनर्थ घडला, संजय कपूर यांच्या मृत्यूचे धक्कादायक कारण समोर
मुलाच्या जन्मापूर्वी टोकाचे वाद
संजय कपूर याच्यासोबत लग्न होण्यापूर्वी करिश्माचे नाव अभिषेक बच्चनसोबत जोडले गेले होते. या दोघांचा साखरपुडा झाला असून दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या त्यावेळी चर्चा झडत होत्या. मात्र या सगळ्या चर्चा खोट्या ठरवत करिश्माने 2003 साली उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 2 वर्षानंतर या दोघांना मुलगी झाली जिचं नाव समायरा ठेवण्यात आलं. 2010 साली या दोघांना मुलगा झाला ज्याचं नाव कियान ठेवण्यात आलं. मुलाच्या जन्मापूर्वी करिश्मा आणि संजय यांच्यात टोकाचे वाद झडण्यास सुरूवात झाली होती.
करिश्माने केली होती पोलिसांत तक्रार
2011 साली करिश्मा आणि संजय कपूर यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघांचा घटस्फोट झाला मात्र त्यापूर्वी दोघांनी एकमेकांवर जबरदस्त आरोप केले होते. करिश्माने संजय कपूरच्या विरोधात पोलिसांत तक्रारही केली होती. करिश्माने एका मुलाखतीमध्ये सांगितले की संजय कपूर तिला शोभेची बाहुली समजत होता. मला नवऱ्याने अनेकदा मारहाण करायचा आणि मारहाणीचे व्रण दिसू नये यासाठी मी मेकअप करायचे असे करिश्माने सांगितले होते. करिश्माने केलेला सगळ्यात मोठा खळबळजनक आरोप होता की हनीमूनला गेलेले असताना संजय कपूर याने तिच्यावर त्याच्या मित्रासोबत शय्यासोबत करण्यासाठी जबरदस्ती केली होती. 2016 साली करिश्मा आणि संजय कपूर यांचा घटस्फोट झाला.
नक्की वाचा : अभिनेत्री करिश्मा कपूरच्या Ex-पतीचे निधन; पोलो खेळता खेळता गमावला जीव
रणधीर कपूर यांचा लग्नाला विरोध होता
करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी या लग्नाला विरोध केला होता. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले होते की, 'आमच्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कपूर खानदानातील आहोत. आम्ही कधीही पैशांच्या मागे धावत नाही. देवाने आम्हाला पैशांसोबत प्रतिभाही दान दिली आहे, ज्याच्या जोरावर आम्ही पैसा कमावू शकतो. संजय थर्ड क्लास माणू आहे. लग्नानंतरही त्याची लफडी होती आणि याबद्दल संपूर्ण दिल्लीला माहिती आहे. '
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world