Google Pay, PhonePe, Paytm किंवा कोणत्याही UPI ॲपचा वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने, जी UPI चालवणारी संस्था आहे, त्यांनी UPI च्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता P2P 'कलेक्ट रिक्वेस्ट' नावाचे फीचर बंद केले जाणार आहे, ज्याला 'पुल ट्रान्झॅक्शन' असेही म्हणतात. याचा सरळ अर्थ असा आहे की, 1 ऑक्टोबर 2025 पासून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवण्यासाठीची विनंती पाठवू शकणार नाही.
UPI चा नवा नियम काय आहे?
NPCI ने सर्व बँका, पेमेंट ॲप्स आणि UPI प्लॅटफॉर्म्सना स्पष्ट निर्देश दिले आहेत की 1 ऑक्टोबर 2025 पासून P2P कलेक्ट रिक्वेस्ट सिस्टीम पूर्णपणे बंद केली जावी. याचा अर्थ असा की, या तारखेनंतर तुम्ही पैसे मागण्याची कोणतीही विनंती कोणालाही पाठवू शकणार नाही किंवा प्राप्त करू शकणार नाही. NPCI ने हा महत्त्वपूर्ण बदल युजर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी केला आहे.
(नक्की वाचा- PF Withdrawals: ATM मधून निघणार PF चे पैसे! 7.8 कोटी खातेधारकांना मोठा दिलासा, 'या' महिन्यापासून सुविधा)
हा बदल का केला जात आहे?
P2P 'कलेक्ट रिक्वेस्ट' फीचरचा वापर अनेकदा फसवणुकीसाठी केला जात होता. फसवणूक करणारे लोक या फीचरचा गैरवापर करून लोकांना पैसे मागण्याची विनंती पाठवत असत. अनेकदा लोक पैसे येणार आहेत असे समजून ही रिक्वेस्ट स्वीकारायचे आणि त्यामुळे त्यांचे पैसे चोरीला जायचे.
त्यामुळे यापुढे तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीकडून पैसे मिळवायचे असतील, तर तुम्ही त्याला 'कलेक्ट रिक्वेस्ट' पाठवू शकणार नाही. आता तुम्हाला थेट पैसे पाठवावे लागतील. तुम्ही जर पैसे देत असाल तर ते 'पुश ट्रान्झॅक्शन' असेल. तुम्ही पूर्वीप्रमाणेच QR कोड स्कॅन करून, UPI ID वापरून किंवा बँक अकाउंट नंबर वापरून पेमेंट करणे सुरू ठेवू शकता. या सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही.
(नक्की वाचा- Online Shopping: ऑनलाइन सेलमध्ये वस्तू इतक्या कशा मिळतात? कंपन्यांची छुपी बिझनेस स्ट्रॅटेजी जाणून घ्या)
सर्व बँका आणि पेमेंट ॲप्स त्यांच्या सिस्टीममध्ये बदल करत आहेत. त्यामुळे तुमचे UPI ॲप्स आणि बँकिंग ॲप्स वेळेवर अपडेट ठेवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीची 'कलेक्ट रिक्वेस्ट' भविष्यातही स्वीकारू नका. कारण अनेक ॲप्समध्ये हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होतील. NPCI चा हा निर्णय युजर्सच्या सुरक्षेसाठी आणि ऑनलाईन फसवणूक थांबवण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.