Repo Rate: रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वात रेपो दर कपातीचा हॅट्ट्रिक झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. कर्जदारांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. रेपो दरात 0.50 टक्क्यांच्या दर कपातीनंतर दर 6 वरुन 5.50 टक्के झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या (MPC) बैठकीत एकमताने दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील सहा महिन्यात रेपो दरात एका टक्क्यांची कपात झाली आहे. त्यामुळे गृहकर्जदारांचा मासिक हप्ता कमी होण्यास खूप मोठी मदत होणार आहे.
फेब्रुवारी-एप्रिल महिन्यात रेपो दरात कपात
रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये रेपो दरात कपात केली होती. आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्के कपात केली होती. फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. त्यानंतर एप्रिल महिन्यात देखील रेपो दरात 0.25 टक्के कपात केली होती. त्यानंतर रेपो दर 6 टक्क्यांवर आला होता.
(नक्की वाचा- Dividend: हे तीन शेअर्स करून देतील हमखास फायदा, गुंतवणुकीसाठी आज शेवटची संधी)
रेपो दर म्हणजे काय?
रेपो दर हा व्याज दर आहे ज्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील इतर बँकांना कर्ज देते. रेपो दर वाढला की बँकांना महागड्या दराने कर्ज मिळते. त्याच वेळी, जेव्हा रेपो दरात कपात केली जाते, तेव्हा बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात कर्ज मिळू शकते.
(नक्की वाचा- अदाणी समूहाकडून 74,945 कोटींचा करभरणा, गेल्या वर्षीच्या तुलनेत 29% वाढ)
रेपो दर कमी झाल्यास फायदा काय?
रेपो दर कमी झाल्यानंतर बँका होम लोन आणि कार लोन यांसारख्या कर्जांवरील व्याजदर देखील कमी करू शकतात. तुमचे सर्व कर्ज स्वस्त होऊ शकतात आणि ईएमआय देखील कमी होईल. जर व्याजदर कमी झाले तर घरांची मागणी वाढेल. अधिक लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतील.