काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात (22 एप्रिल) सर्वसामान्यांना नागरिकांवर निशाणा साधण्यात आला. यामध्ये 27 पर्यटकांचा हकनाक बळी गेला. या घटनेमुळे केवळ देशभरातच नाही तर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दहशवादी हल्ल्यावर वचक बसवण्यासाठी भारताकडूनही पावलं उचलण्यात आली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची बाब समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी कटरा ते श्रीनगर रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करणार होते. यासाठी त्यांचा तिथं जाण्याचा प्लान होता. मात्र हवामान बिघडल्याने मोदींचा दौरा पुढे ढकलण्यात आला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याचा इशारा गुप्तचर संघटनांनी दिला आहे. मात्र पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
नक्की वाचा - Pahalgam Attack : भारताकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी; आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी
कटरा ते श्रीनगर रेल्वेमुळे काश्मीर खोरं देशातील इतर राज्यांशी जोडलं जाणार आहे. या रेल्वेमुळे काश्मीरशी कनेक्टिव्हिटी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मोठ्या संख्येने लोक काश्मीरशी जोडले जातील. याचा परिणाम काश्मीरच्या विकासावर होणार असल्याचं सांगितलं जातं. यातूनच पाकिस्तानने दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती काश्मीर अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचं सांगितलं जातं.
अद्याप तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीर दौऱ्याची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र यापुढे पंतप्रधान मोदी काश्मीरच्या दौऱ्यावर येतील तेव्हा अधिक काळजी घेणं आवश्यक ठरणार आहे.