Video Viral: मुलं किंचाळत होती, महिलेने हात जोडले, तरी दया आली नाही, टोळक्याचा कार चालकावर हल्ला, कारण...

Viral VIDEO: बंगळुरू-मैसूर द्रुतगती मार्गावर एका धावत्या महामार्गाच्या मध्यभागी एका कुटुंबावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कारच्या डॅशकॅममध्ये हा संपूर्ण थरार कैद झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

देशातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या बंगळुरू-मैसूर द्रुतगती मार्गावर कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महामार्गावर एका टोळीने कार थांबवून, त्यात असणाऱ्या महिला आणि लहान मुलांसमोरच चालकाला गाडीबाहेर ओढून बेदम मारहाण केली. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा थरार पाठीमागून येणाऱ्या एका कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाला असून, सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कारचे दरवाजे उघडून लोखंडी वस्तूने हल्ला

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, महामार्गाच्या मध्यभागी एका निळ्या रंगाच्या कारला काही तरुणांनी अडवले. त्यानंतर या जमावाने थेट कारवर चाल करून बळजबरीने गाडीचे दरवाजे उघडले. कारचा दरवाजा उघडताच जमावाने ड्रायव्हर सीटवर बसलेल्या व्यक्तीवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव सुरू केला.

Advertisement

पाहा VIDEO

हात जोडून विनंती केली तरी...

कारमध्ये एक महिला आणि एका लहान मुलासह एकूण 4 ते 5 प्रवासी होते. त्यांच्यासमोरच हा हल्ला सुरू होता. जमावातील किमान एक जण पीडित व्यक्तीला लोखंडी वस्तूने मारत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी, कारमधील महिला अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली आणि तिने जमावासमोर हात जोडून हल्ला थांबवण्याची विनंती केली. मात्र, तरीही गुंडांनी चालकाला कारमधून बाहेर ओढले आणि रस्त्यावर पाडून बेदम मारहाण केली. हा भीषण प्रकार पाहून महामार्गावरून जाणाऱ्या इतर काही वाहनचालकांनी आणि प्रवाशांनी मध्यस्थी करण्याचा आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

(नक्की वाचा-  Pandharpur Wari: वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी; राज्य सरकारचा निर्णय

टोल गेटजवळील किरकोळ अपघातामुळे वाद

प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व वाद एका रस्त्यावरील अपघातामुळे सुरू झाला. पीडित कुटुंब आणि आरोपींची कार बंगळुरूच्या दिशेने जात असताना श्रीरंगपट्टण टोल गेटजवळ त्यांच्यात एक किरकोळ अपघात झाला होता. अपघातानंतर दोन्ही पक्षांमध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर दोन्ही गाड्या पुढे निघून गेल्या.

मात्र, काही अंतरावर गेल्यावर आरोपींना समजले की त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी पीडित कार चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. पण भीतीने किंवा इतर कारणामुळे त्याने गाडी थांबवण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी महामार्गावर कुटुंबाच्या कारचा पाठलाग केला आणि मद्दूर परिसरात त्यांना गाठून भररस्त्यात गाडी आडवी लावून हा जीवघेणा हल्ला चढवला.

अद्याप याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा अटकेची माहिती समोर आलेली नाही.
 

Topics mentioned in this article