
नक्षलवादी चळवळीतील सर्वोच्च नेता बसवराजू याचा सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. नक्षलवादविरोधी कारवाईत सुरक्षा दलाचं हे मोठं यश मानलं जात आहे. माओवादी नेता बसवराजूसह काही माओवाद्यांच्या मृतदेहांवर छत्तीसगड पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी नारायणपूरमध्ये तातडीने अंत्यसंस्कार केले. न्यायालयाच्या आदेशानंतरही कुटुंबीयांना मृतदेह न देता बळजबरीने हे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
चार दिवसांपूर्वी छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर झालेल्या चकमकीत माओवादींचा सर्वोच्च नेता गंगन्ना उर्फ बसवराजू ठार झाला होता. बसवराजूचा मृतदेह घेण्यासाठी त्याचे काही नातेवाईक आणि मोठा भाऊ नारायणपूरला गेले होते. मात्र, छत्तीसगडच्या सुरक्षा दलांनी त्यांना मृतदेह दिला नाही. त्यांच्या बाबतीत भेदभावपूर्ण वागणूक करण्यात आल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
नक्की वाचा - Basavaraju : अभियांत्रिकीची पदवी, युद्धातही तज्ज्ञ; दीड कोटींचं बक्षीस असलेला अत्यंत धोकादायक नक्षलवादी ठार
न्यायालयाने दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी छत्तीसगड पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, 26 मेच्या सायंकाळी बसवराजूसह आठ माओवाद्यांवर नारायणपूर येथील स्थानिक आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत पोलिसांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात न देता थेट अंत्यसंस्कार करण्यात आले. या आठ माओवाद्यांमध्ये आंध्रप्रदेशातील 2, तेलंगणातील 3 आणि छत्तीसगडमधील 3 माओवादींचा समावेश होता. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही मृतदेह न देता जबरदस्तीने अंत्यसंस्कार करून मानवी हक्कांचा भंग करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता बेला भाटिया यांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world