जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, शत्रूंना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. माझं कर्तव्य आहे की, आपल्या सेनेसोबत राहून शत्रूंना जशासतसं उत्तर देणे. तुम्हाला जे हवंय तेच होईल, असंही सरंक्षण मंत्र्यांनी म्हटलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, भारतीय सैनिक सदैव देशाचं संरक्षण करत असतात. एकीकडे आपले सैनिक सीमेवर जागता पहारा देत असतात. तर दुसरीकडे माझं कर्तव्य आहे की, सैनिकांसोबत उभं राहून मी देखील देशाचं संरक्षण केलं पाहिजे. भारताकडे वाकड्या नजरेने पाहाणाऱ्यांना जशासतसं उत्तर दिलं जाईल. तुम्हाला जे हवं आहे, ते होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आणि जिद्द तुम्हाला माहितच आहे.
( नक्की वाचा : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी )
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कडक पावले उचलली आहेत, ज्यात सिंधू पाणी करार निलंबित करणे याचाही समावेश आहे.
(नक्की वाचा- Pehalgam Terror Attack: भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची भंबेरी, लष्करी युद्ध सरावाला सुरुवात)
पाकिस्तानसोबतच्या व्यापारावर बंदी
भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे येणाऱ्या किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि सार्वजनिक धोरणाच्या हिताच्या दृष्टीने लागू करण्यात आली असून, याला अपवाद हवा असल्यास केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.