India Strike on Pakistan: पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला केला. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवा अशी संपूर्ण देशातून एकमुखाने मागणी होत होती. मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेच्या दरम्यान भारतीय हवाईदलाने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ले केले. एकूण 9 ठिकाणांना बारताने लक्ष्य केले असून दहशतवादी आणि त्यांचे अड्डे हेच लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याचे तळ आणि सर्वसामान्यांना कुठेही लक्ष्य करण्यात आले नाही असे भारताने स्पष्ट केले आहे. या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबाच्या अड्ड्यांना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आलेले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबाचे म्होरके हाफीज सईद आणि मसूद अजहर हे म्होरके आहेत. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा खात्मा झाल्याचे वृत्त कळते आहे, मात्र या वृत्ताला अधिकृतरित्या कोणीही दुजोरा दिलेला नाही. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 62 जण ठार मारले गेले असून हा आकडा आणखी वाढू शकतो.
नक्की वाचा : 'ऑपरेशन सिंदूर'चं 26/11 हल्ला कनेक्शन; दहशतवादी कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डाही उद्ध्वस्त
या 9 ठिकाणांवर केला हल्ला
- मरकज सुभान अल्लाह, बहावलपुर - जैश-ए-मोहम्मद
- मरकज तैयबा, मुरीदके - लश्कर ए तोयबा
- सरजल, तेहरा कलां - जैश-ए-मोहम्मद
- महमूना जोया, सियालकोट - हिजबुल मुजाहीदीन
- मरकज अहले हदीस, बरनाला - लश्कर ए तोयबा
- मरकज अब्बास, कोटली - जैश ए मोहम्मद
- मस्कर राहील शाहिद, कोटली -हिजबुल मुजाहीदीन
- शावई नाला कँप, मुजफ्फराबाद - लश्कर ए तोयबा
- सैयदना बिलाल कँप, मुजफ्फराबाद - जैश ए मोहम्मद
100 किलोमीटरपर्यंत आत घुसून केला हल्ला
भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या 9 ठिकाणांवर हल्ला करण्यात आला, त्यातील 4 ठिकाणे ही पाकिस्तानातील आहेत. उरलेली 5 ठिकाणे ही पाकव्याप्त कश्मीरमधील आहेत. अंतराबाबत बोलायचे झाल्यास काही ठिकाणे ही पाकिस्तानी सीमेपासून 30 ते 100 किलोमीटर आतमध्ये आहेत.
नक्की वाचा : पहलगामचा बदला, ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं?
पाकिस्तानी सीमेपासून हल्ल्याच्या ठिकाणांचे अंतर
- बहावलपूर - 100 किमी आत
- मुरीदके - 30 किमी आत
- गुलपुर-35 किमी आत
- सवाई कँप-30 किमी आत
- बिलाल कँप- अंतर स्पष्ट नाही
- कोटली कँप- 15 किमी आत
- बर्नाला कँप- 10 किमी आत
- सरजाल कँप- 8 किमी आत
- मेहमूना कँप- 15 किमी आत
जैश आणि लश्करची प्रमुख कार्यालये उद्ध्वस्त
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती आणि ती सफलतेने पूर्ण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कारवाईवर लक्ष ठेवून होते. या हल्ल्यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरीदकेमधील लश्कर-ए-तोयबाचे मुख्यालय उडवण्यात आले. ही दोन्ही मुख्यालये पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये आहेत.
पहलगाम हल्ल्याच्या दोन आठवड्यानंतर उत्तर
22 एप्रिल रोजी कश्मीरमधील पहलगाम इथे फिरायला आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या 2 आठवड्यानंतर भारताने पाकिस्तानला उत्तर दिले आहे. मंगळवारी रात्री उशिरा ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले ज्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील एकूण 9 ठिकाणांचा समावेश आहे.