Heat Wave : सध्या मार्च महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे... पाऱ्याने मुंबई उपनगर आणि पालघर जिल्ह्यात आधीच चाळीशी पार केलीये. अजून म्हणावा तसा उन्हाळा सुरूही झालेला नाही. तोच उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे पुढील दोन महिने कसं होणार, या विचारानेच नागरिकांना घेरी येऊ लागली आहेत. उन्हाळ्याचे सर्वसामान्यांवर विविध प्रकारे परिणाम होत असतात. या उन्हामुळे मानसिक आणि शारिरीक त्रासासह आर्थिकही नुकसान होत आहे. उन्हाळा आपल्याला गरीब बनवतंय... हो हे खरं आहे. उन्हाचा थेट परिणाम आपल्या खिशात येणाऱ्या पैशांवरही होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विशेष म्हणजे सौदी अरेबिया, ओमान, सुदान आफ्रिकेतील देशांपेक्षाही भारतात उष्णता जास्त आहे. वाढती उष्णता हा संपूर्ण भारताला भेडसावणारा प्रश्न आहे आणि सध्या तर सुरूवात आहे. सूर्याने अतिरेकी हल्ला करायला आताशी सुरुवात केलीय. 2024 हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 2025 साली हा रेकॉर्ड मोडायचाच असा निश्चयच सूर्याने केला आहे आणि त्यासाठी त्याने कामालाही सुरुवात केली आहे.
ऊन भिकारी बनवतंय...?
उष्णतेचे रेकॉर्ड मोडण्यासोबतच या भीषण गरमीने भारताला भिकारी बनवण्याचाही कट रचलाय. ऐकताना थोडं विचित्र वाटेल मात्र भारतात आजही 75 टक्के जनता ही कष्टकरी जनता आहे. या जनतेला रस्त्यावर उतरल्याशिवाय काम करता येत नाही किंवा कामाचे ठिकाण गाठता येत नाही. यामध्ये शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य कर्मचारी, डिलिव्हरी बॉइज, फेरीवाले अशा अनेकांचा समावेश आहे. या सर्वांना भीषण उन्हाचा त्रास झेलत काम करण्याशिवाय पर्याय नसतो. या सर्वांवर बहुतांश भारत देश अवलंबून आहे. उन्हामुळे या सर्वांची उत्पादन क्षमता (effect of heat on human productivity) 10 टक्क्यांपर्यंत कमी होत असते. उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते, थकवा जाणवतो. सोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. वाढत्या उष्णतेचा परिणाम शेतीवर होत असतो, उन्हामुळे बाष्पीभवन जास्त होतं ज्यामुळे पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते. यामुळे अनेकदा आर्थिक नुकसानही होत असतं.
एसीमुळे उष्णतेत वाढ...
मॅकेन्झीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले होते की, 20 कोटी लोक या उष्णतेमुळे बाधित होऊ शकतात. या भयंकर उष्णतेमुळे कार्यक्षमतेवर होणारा परिणाम जीडीपीच्या 2.5 ls 4.5 टक्क्यांपर्यंत होऊ शकतो. या उष्णतेमुळे होणारं नुकसान कमी करण्यात आपण सर्व यशस्वी झालो तर उत्पादन क्षमताही वाढेल आणि त्याचा सकारात्मक आर्थिक परिणामही पाहायला मिळू शकेल. यामुळे केंद्र सरकारकडे इतर योजनांवर खर्च करण्यासाठी अधिकचा पैसा हाती राहण्याची शक्यता आहे. आपले सूर्यदेव त्रास देण्यात कोणताही भेदभाव करत नाही, ज्याच्या डोक्यावर छप्पर नाही त्या सर्वांना तो तडाखा देतो. मग ती व्यक्ती एक मिनिटासाठी उघड्यावर असो अथवा एक तास.
नक्की वाचा - Heat Wave : उष्णतेची लाट कधी आणि कशी जाहीर केली जाते? काय काळजी घ्यावी
यापासून बचावासाठी एसीचा मार्ग स्वीकारला जातो. हा एसी थंडावा देत असला तरी तो प्रत्यक्षात सूर्याचा छुपा मित्र आहे, जो भविष्यात तुम्हालाच छळणार आहे. का माहिती आहे? कारण एसीमुळे उष्णता कमी होत नाही तर ती अधिक वाढते. कारण एसीसाठी वीज लागते आणि वीजनिर्मितीसाठी आजही कोळसा जाळावा लागतो. एसीसाठी वीजेची मागणी वाढते, त्यासाठी कोळसा जास्त जाळावा लागतो आणि त्यातून अधिक उष्णता निर्माण होते. भारतात 100 पैकी 24 घरांमध्ये एसी आहेत. अमेरिकेतील 100 पैकी 85 घरांत तर चीनच्या शहरी भागातील प्रत्येक घरात एसी आहेत. 2050 पर्यंत अशीच स्थिती राहिली तर भारतातील एसीसाठीच्या वीजेची गरज आफ्रिकेच्या एकूण वीजेच्या मागणीइतकी झालेली असेल.
आपण महाराष्ट्राची स्थिती काय आहे ते पण समजून घेऊया. महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती ही लक्षणीयरित्या वेगळी आहे. किनारपट्टी भागात हवेत आर्द्रता असते, ज्यामुळे प्रत्यक्ष उष्णतेपेक्षा भासणारा उकाडा अधिक असतो. मराठवाडा आणि विदर्भातील तापमान हे जास्त असते आणि तिथले हवामान कोरडे असल्याने उष्णतेचा चटका भयंकर असतो. फेब्रुवारी 2025 हा आजवरचा सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे.
नक्की वाचा - Mumbai News: मुंबईकरांनो काळजी घ्या! उष्माघात टाळण्यासाठी BMCच्या सूचना; काय करावं-काय करु नये?
हीट वेव्हचा सोप्या भाषेत अर्थ समजावून सांगायचा झाल्यास, विशिष्ट परिस्थितीमुळे उष्णतेचा निचरा होण्यास कोणताही मार्ग नसतो. उष्णता एका बंदिस्त खोलीत बंद झाल्याप्रमाणे त्या भागामध्येच अडकून राहते. हीट वेव्ह ही तेव्हाच घोषित होते जेव्हा किनारपट्टी भागात तापमान 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते आणि विदर्भ, मराठवाड्यात हे तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होते. शहरी भागांत उष्णता अधिक जाणवण्याचे कारण म्हणजे पत्र्याची घरे. धातूचे पत्रे सररासपणे वापरले जातात, जे लवकर गरम होतात आणि या पत्र्यांमुळे उष्णता घरातच अडकून राहाते. शहरांमध्ये व्यावसायिक इमारती या काचेच्या बनलेल्या असतात. या काचेच्या इमारतींमुळे सूर्यप्रकाश परावर्तित होतो. या काचेच्या इमारती प्रकाश आणि उष्णता दोन्ही परावर्तित करू लागतात, ज्यामुळे डबल सन इफेक्ट निर्माण होतो. ही बाब उष्णता वाढवण्यास कारणीभूत ठरते. हीच बाब आहे की ज्यामुळे सौमित्र यांची आज ऊन जरा जास्तच आहे ही कविता उन्हाळ्यात वारंवार आठवते आणि मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाची वाट पाहिली जाऊ लागते.