भारत आणि चीन यांच्यातील थेट विमानसेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत प्रेस रिलीजद्वारे घोषणा केल्यानंतर, तातडीने इंडिगो एअरलाइनने 26 ऑक्टोबर पासून दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. इंडिगोने जाहीर केल्यानुसार, पहिल्या टप्प्यात कोलकाता आणि ग्वांगझू दरम्यान उड्डाणे सुरू होणार आहेत.
कोलकाता ते ग्वांगझू या मार्गावर दररोज नॉन-स्टॉप विमाने सुरू होतील. कोलकाता व्यतिरिक्त, दिल्ली आणि ग्वांगझू दरम्यान देखील लवकरच थेट उड्डाणे सुरू केली जातील, अशी घोषणा एअरलाइनने केली आहे. या उड्डाणांसाठी इंडिगो त्यांच्या एअरबस ए320 निओ विमानाचा वापर करेल.
चार वर्षांनंतर हवाई वाहतूक पूर्ववत
भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा कोविड-19 साथीच्या आजारामुळे 2020 मध्ये बंद करण्यात आली होती. हवाई सेवा बंद झाल्यानंतर याच काळात गलवान व्हॅली संघर्षामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक बिघडले होते.
सुमारे चार वर्षांनंतर आता ही सेवा पुन्हा सुरू होत असल्यामुळे, व्यापारी, पर्यटन आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या घोषणेनंतर इंडिगोने घेतलेला हा निर्णय दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सकारात्मकता दर्शवणारे पाऊल आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world