अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Monsoon Update 2026: कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या सर्वांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्या क्षणाची संपूर्ण देश चातकरसारखी वाट पाहत होता, तो क्षण आता अगदी जवळ आला असून पुढील काही तासांतच मान्सूनचे आगमन होणार आहे.
काय आहे नवे अपडेट?
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 ते 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अत्यंत पोषक आहे. 16 तारखेला अंदमानमध्ये पोहोचल्यानंतर तब्बल 18 दिवसांचा प्रवास करून मान्सून आता देवभूमी मानल्या जाणाऱ्या केरळमध्ये गुरुवारी हजेरी लावेल. यंदा मान्सून आपल्या नियमित वेळेपेक्षा 4 दिवस उशिराने दाखल होत असला, तरी त्याच्या आगमनाची चाहूल लागल्याने बळीराजासह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.
( नक्की वाचा : Monsoon 2026: पावसाच्या वाटेत 'व्हिलन'ची एन्ट्री! शेतकरी ते सर्वसामान्य सर्वांचीच चिंता वाढली, वाचा सर्व अपडेट )
यंदा पावसाचे प्रमाण नेमके कसे असणार?
भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या पावसाचा जो अंदाज वर्तवला आहे, त्यानुसार देशात 86 ते 94 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या मते, दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) तुलनेत हा पाऊस सुमारे 90 टक्के असू शकतो.
अरबी समुद्रासह लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या काही भागांतही मान्सून पुढे सरकण्यासाठी आता वातावरण अनुकूल झाले आहे. मान्सून जूनच्या सुरुवातीलाच केरळमध्ये येतो, मात्र यंदा 4 जूनच्या आसपास तो केरळ किनारपट्टीवर धडकेल असा नवा अंदाज आहे.
महाराष्ट्राला मान्सूनची किती प्रतीक्षा करावी लागेल?
केरळमध्ये मान्सून दाखल होत असला तरी महाराष्ट्राला मात्र मुख्य मान्सूनसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सध्या मान्सून केरळच्या उंबरठ्यावर असताना महाराष्ट्रात मात्र मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. राज्याच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण असून लवकरच पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा 'यलो अलर्ट' जारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मान्सून येण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यामुळे उष्णतेची लाट ओसरण्यास मदत होणार आहे.