Kashmir Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा जगभरातील संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात आहे. यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. आज सायंकाळी 6 वाजता दिल्लीत ही सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी केंद्र सरकारकडे बैठक घेण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानंतर आज सायंकाळी ही बैठक घेण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान दिल्लीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गट उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. अपरिहार्य कारणामुळे आमचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे. अनुपस्थित राहण्याबद्दल अरविंद सावंत यांनी खेद देखील व्यक्त केला आहे. भ्याड हल्याचा प्रतिकार करण्यासाठी केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल, असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं.
काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने आज गुरुवारी (24 एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सरकारकडून गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय बैठकीत ब्रीफ करतील. गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह या मुद्द्यावरुन विविध पक्षाच्या नेत्यांशी बातचीत करीत आहेत. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली होती.