पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी महाकुंभ मेळ्याच्या आयोजनाबद्दल केंद्र सरकार, उत्तर प्रदेश प्रशासनाचे कौतुक केले आहे. सोबतच त्यांनी प्रयागराजच्या जनतेचेही कौतुक केले असून 45 दिवसांच्या महाकुंभ मेळ्यात या सगळ्यांनी भाविकांची जी सेवा केली त्याला तोड नाही असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. महाकुंभ मेळ्याची बुधवारी सांगता झाली. या महाकुंभ मेळ्यात 66 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमस्थळी (Ganga, Yamuna, Saraswati Sangam) आयोजित करण्यात आलेला हा महाकुंभ मेळा 12 वर्षानंतर आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सविस्तर ब्लॉग लिहिला असून यामध्ये त्यांनी जनतेची माफीही मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "मला कल्पना आहे की, इतका मोठ्या प्रमाणावर आयोजन रणे ही सोपी बाब नव्हती, मी गंगा माता, यमुना माता आणि सरस्वती मातेच्या आराधनेत काही कमतरता राहिली असेल तर त्याबद्दल माफी मागतो. या देशाची जनता ही माझ्यासाठी ईश्वरासमान आहे. भाविकांच्या सेवेत काही कमतरता राहिली असेल तर मी त्याबद्दलही माफी मागतो. "
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, "गेल्या 45 दिवसांत मी रोज पाहात होतो की लाखो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रयागराजमधील संगमाच्या दिशेने येत होते. संगमावर स्नानासाठी येणारा हा जनसागर वाढतच जात होता. प्रत्येक भाविकाच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, तो म्हणजे संगमावर पवित्र स्नानाचा." पंतप्रधान मोदी यांनी संगमावर जात 5 फेब्रुवारी रोजी पवित्र स्नान केले. त्यांनी या निमित्ताने बोलताना म्हटले की, महाकुंभ मेळा हा व्यवस्थापन कौशल्य शिकणाऱ्यांसाठी आणि नियोजन तसेच धोरणे आखणाऱ्यांसाठी नवा धडा बनला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगात एकही सोहळा आयोजित केला जात नाही, त्यामुळे नियोजन कौशल्याचे धडे शिकण्यासाठी महाकुंभ मेळ्याशिवाय इतर कोणतेही दुसरे उदाहरण देता येऊ शकणार नाही.
नक्की वाचा : CBSE दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार! कोणते मार्क्स धरणार ग्राह्य? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, "कोणलाही आमंत्रण देण्यात आले नाही, मात्र तरीही कोट्यवधी भाविक संगमावर स्नानासाठी आले होते. ही गोष्ट पाहून सगळं जग आश्चर्यचकीत झाले आहे. " त्यांनी पुढे म्हटले की, पवित्र स्नानानंतर या भाविकांच्या चेहऱ्यावर जे तृप्ततेचे भाव दिसत होते, ती दृश्ये अजूनही डोळ्यापुढून जात नाही. या भाविकांमध्ये महिला, पुरूष, आबालवृद्ध सगळे होते, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता असे पंतप्रधानांनी म्हटले. तरुण पिढीही या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाली असल्याचे पाहून मनापासून समाधान वाटल्याचेही त्यांनी म्हटले.