
Parliament Monsoon Session PM Modi Speech: आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, गुजरात विमान दुर्घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांना संबोधित केले. यावेळी त्यांनी हे अधिवेशन विजयोत्सव करण्याचा क्षण असल्याचे म्हटले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
"हे पावसाळी अधिवेशन देशासाठी गौरवशाली ठरणार आहे. या सत्रात राष्टगौरव आणि विजयोत्सव साजरा करण्याचे हे सत्र आहे. या जल्लोषात एकसुराने सहभागी होऊ. संपूर्ण जगात भारतीय सैन्याच्या सामर्थ्याचा रुप दिसले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने जे लक्ष्य ठरवले होते ते 100 टक्के पूर्ण केले. आतंकवाद्यांच्या आकांना 22 मिनिटात ऑपरेशन सिंदूरमधून जमीनदोस्त केले," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पहलगाममधील क्रूर अत्याचार आणि हत्याकांडाने संपूर्ण जग हादरले होते. संपूर्ण जगाचे लक्ष दहशतवादी आणि त्यांच्या आकांकडे वेधले गेले होते. त्यावेळी पक्षीय हितसंबंध बाजूला ठेवून, आपल्या बहुतेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि राज्य प्रतिनिधी देशाच्या हितासाठी जगासमोर गेले आणि एका आवाजात दहशतवाद्यांचा आका पाकिस्तानला उघड करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल मी सर्व खासदार आणि पक्षांचे कौतुक करू इच्छितो, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचेही कौतुक केले.
यामध्ये "मेड इन इंडिया सैन्य शक्तीच्या नव्या रुपाकडे जग आकर्षित झाले आहे. संसद जेव्हा या विजयोत्सवाचा एकसुराने जल्लोष करेल तेव्हा भारतीय सैन्यशक्तीला बळ मिळेल. देशवासियांना प्रेरणा मिळेल. गेल्या 10 वर्षांत निर्माण झालेल्या पाण्याच्या साठ्यात जवळजवळ तिप्पट वाढ झाली आहे, ज्यामुळे येत्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. पहिल्यांदाच अंतराळ स्थानकावर भारतीय ध्वज फडकवणे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे," असंही ते पुढे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world