Rajasthan Bus Accident: राजस्थानाच्या जैसलमेर-जोधपूर हायवेवर झालेल्या भीषण बस अपघतात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास जैसलमेरहून जोधपूरकडे जाणाऱ्या एका खासगी बसला अचानक आग लागल्याने 20 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 15 हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत, ज्यात चार महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमध्ये एकूण 57 प्रवासी प्रवास करत होते. जैसलमेरमधून दुपारी 3 वाजता ही बस जोधपूरकडे निघाली होती. जैसलमेर-जोधपूर महामार्गावर असताना अचानक बसच्या मागील भागातून धूर येऊ लागला.
(नक्की वाचा- Thane News: लाखो रुपयांची लाच घेणाऱ्या शंकर पाटोळेमुळे ठाणे महापालिकेचा कँटीन चालक टेन्शनमध्ये, 17 हजार रुपये)
बसमध्ये धूर दिसताच चालकाने तातडीने रस्त्याच्या कडेला बस थांबवली. मात्र, काही वेळातच आग मोठ्या प्रमाणात वाढली आणि काही मिनिटांतच बस जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांना तातडीने बोलावण्यात आले.
या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणारे लोक तात्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी बचावकार्यात मदत केली. या दुर्घटनेत चार महिला आणि दोन लहान मुलांसह एकूण 15 प्रवासी गंभीररित्या भाजले असून, काहींच्या शरीराचा 70 टक्क्यांपर्यंत भाग भाजल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दुर्घटनेचे कारण शॉर्ट सर्किट
प्राथमिक अंदाजानुसार, बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दुर्घटनाग्रस्त बस अवघ्या पाच दिवसांपूर्वीच खरेदी करण्यात आली होती.