- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, पाकिस्तानसोबत संवादाचे दरवाजे बंद करू नयेत
- दोन्ही देशांमधील तणाव चर्चेतून कमी होईल असं ही ते म्हणाले
- होसबळे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्राची सुरक्षा आणि स्वाभिमान जपतानाच पाकिस्तानसोबत संवादाचे दरवाजे कायमस्वरूपी बंद करू नयेत. दोन्ही देशांमधील तणावाच्या परिस्थितीतही चर्चेची खिडकी उघडी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या विधानाने सर्वांचे कान टवकारले आहेत. त्यांच्या या विधानाचा आता देशाच्या राजकारणात काय परिणाम होतो हे स्पष्ट होणार आहे.
संवाद आणि सुरक्षा यांचा समतोल
होसबळे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचा दाखला दिला. अटलजींनी बसने लाहोरला जाऊन शांततेचा पुढाकार घेतला होता. तर पंतप्रधान मोदींनीही आपल्या शपथविधीला पाकिस्तानला निमंत्रण दिले होते. मात्र, पाकिस्तानने पुलवामासारख्या हल्ल्यांनी या विश्वासाला तडा दिला. "पाकिस्तानने कुरापती काढल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे, पण मुत्सद्दी संबंधांसाठी संवादाचा मार्ग पूर्णपणे थांबवणे अयोग्य ठरेल," असे होसबळे म्हणाले.
मुस्लिम नेतृत्व आणि लव्ह जिहादवर भाष्य
या मुलाखतीत त्यांनी मुस्लिम समाजातील नेतृत्वावरही टीका केली. मुस्लिम समुदायात राष्ट्रवादी नेतृत्व मिळणे कठीण असल्याचे सांगत, फुटीरतावादी विचार असलेल्यांनाच तिथे अधिक समर्थन मिळते, असे ते म्हणाले. तसेच, 'लव्ह जिहाद' हा केवळ प्रेम नसून तो हिंदू मुलींना लक्ष्य करण्याचा एक नियोजित कट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या मुलाखतीत होसबळे यांनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. मात्र पाकिस्तान बाबतचे विधान हे केंद्रस्थानी राहीले.
सनातन धर्म आणि हिंदू राष्ट्र
उदयनिधि स्टालिन यांच्या सनातन धर्मावरील वादावर बोलताना होसबळे म्हणाले की, सनातन हा भारताचा आत्मा आहे. तो वटवृक्षाप्रमाणे अजरामर आहे. "आम्ही भारताला हिंदू राष्ट्र बनवत नाही आहोत, तर भारत हे आधीपासूनच सांस्कृतिक अर्थाने हिंदू राष्ट्र आहे," असेही त्यांनी ठामपणे सांगितले. बंगाल विजयावर ही त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले बंगालमध्ये प्रत्येक हिंदू मतदार हा हिंदू कार्यकर्ता बनला. त्यामुळेच हा मोठा विजय शक्य झाल्याचं त्यांनी स्पष्ट केले.