- आदित्य राज हा मुजफ्फरपूर जिल्ह्याच्या रतनौली गावातील रहिवासी असून नीट परीक्षेत ऑल इंडिया रँक 946 मिळवला आहे
- आदित्यला गावाचा पहिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणार आहे
- प्राथमिक शिक्षण गावातच झाले असून १० वी मध्ये ९१ टक्के गुण मिळवून त्याने शैक्षणिक गुणवत्ता दाखवली होती
नीट परिक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निकालानंतर अनेक ठिकाणी गरिबांच्या लेकरांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. अनेक यशोगाथा समोर येत आहे. मेहनत आणि जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं आहे. त्या पैकीच एक आहे आदित्य राज हा विद्यार्थी. या विद्यार्थ्याने आपल्या कुटुबाचं जणू नशिबच बदललं आहे. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या आदित्यनं नीट परिक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. तो आता गावातला पहिला डॉक्टर बनणार आहे. तो डॉक्टर झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची आर्थिक घडी रूळावर येण्यास मदत होणार आहे.
बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्याच्या रतनौली गावाचा आदित्य राज हा रहिवाशी आहे. या तरुणाने NEET UG 2026 परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आदित्यने ऑल इंडिया रँक (AIR) 946 मिळवला आहे. तर OBC प्रवर्गातून त्याने 295 वी रँक पटकावली आहे. आदित्यचे आजोबा सौखी सहनी यांनी आयुष्यभर मेहनत करत संपूर्ण कुटुंबाला सांभाळले. ते पाटणा शहरात तब्बल 38 वर्षे रिक्षा चालवत होते. तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. आज त्यांच्या नातवाने हे यश संपादीत केले आहे. या यशामुळे संपूर्ण गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. आदित्यच्या रूपाने गावाला पहिला डॉक्टर मिळणार आहे.
विशेष म्हणजे आदित्यचे प्राथमिक शिक्षण गावातीलच रतनौली प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर मध्य विद्यालयातून त्याने 6 वी ते 10 वीचे शिक्षण पूर्ण केले. 2023 मध्ये बिहार बोर्डातून त्याने 10 वीच्या परीक्षेत 91% गुण मिळवले होते. आपल्या गुणवत्तेची चमक त्याने सुरूवाती पासूनच दाखवली होती. त्यानंतर मुजफ्फरपूरच्या आरडीएस कॉलेजमधून त्याने उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे त्याने 'आकाश' कोचिंग सेंटरमधून नीटची तयारी सुरू केली होती.
आदित्यचा हा प्रवास सोपा नव्हता असं त्याचे कुटुंबीय ही सांगतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे तो दररोज घरून तब्बल 15 किलोमीटरचा प्रवास सायकलने करत होता. त्यानंतर तो कोचिंग क्लासला जात असे. क्लास संपल्यानंतरही तो तिथेच थांबून अतिरिक्त अभ्यास करायचा. घरी परतल्यावर रोज 4 ते 5 तास अभ्यास करायचा. पहिल्या प्रयत्नात यश न मिळाल्याने तो खचून गेला नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्याने देशातील कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत हे ऐतिहासिक यश मिळवून दाखवले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world