Harish Rana Euthanasia Process: गाझियाबादमधील हरीश राणा यांच्या इच्छामृत्यूच्या प्रक्रियेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या हरीश यांच्या पालकांनी आपल्या मुलाला या वेदनादायी जगण्यातून मुक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला. अखेर न्यायालयाने पॅसिव्ह युथिनिसिया म्हणजेच निष्क्रिय इच्छामृत्यूला परवानगी दिली असून, आता हरीश यांना सन्मानाने निरोप देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या संवेदनशील प्रक्रियेत नेमकं काय घडतं आणि रुग्णाला वेदना होऊ नयेत म्हणून काय काळजी घेतली जाते, याबद्दल आरएमएल हॉस्पिटलमधील भूलतज्ज्ञ प्रोफेसर डॉ. संदीप मिश्रा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
इच्छामृत्यूची कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया
भारतात इच्छामृत्यूची परवानगी मिळवणे ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हरीश राणा यांच्या प्रकरणात दोन स्वतंत्र मेडिकल बोर्डांची स्थापना करण्यात आली होती. पहिल्या बोर्डाने रुग्णाची सखोल तपासणी करून आपला अहवाल सादर केला, तर दुसऱ्या बोर्डाने त्या अहवालाची निष्पक्षपातीपणे पडताळणी केली.
जेव्हा दोन्ही बोर्डांचे यावर एकमत झाले की रुग्ण पुन्हा कधीही बरा होऊ शकत नाही, तेव्हाच पॅसिव्ह युथिनिसियाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कडक नियमावलीचे पालन करावे लागते.
( नक्की वाचा : Euthanasia: आता घरबसल्या करता येणार 'इच्छामृत्यू'चं नियोजन? काय आहे सुप्रीम कोर्टाचा नवा नियम आणि लिविंग विल? )
वेदनामुक्त निरोपासाठी विशेष उपाययोजना
पॅसिव्ह युथिनिसियामध्ये रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शारीरिक वेदना होऊ नयेत, याची विशेष खबरदारी घेतली जाते. डॉ. मिश्रा यांच्या मते, रुग्णाला टप्प्याटप्प्याने दिले जाणारे कृत्रिम उपचार बंद केले जातात.
रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल, तर तो सर्वात आधी काढला जातो. त्यानंतर हळूहळू औषधांचे प्रमाण कमी केले जाते आणि शेवटी अन्नाचा पुरवठा कमी केला जातो. या संपूर्ण काळात रुग्णाला पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये ठेवले जाते, जिथे केवळ त्याच्या वेदना कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
( नक्की वाचा : UPSC Result 2025 : पोराचा युपीएससीत देशात 10वा नंबर, अख्ख्या गावाने पेढे वाटले; पण बाबा भलतेच नाराज, कारण काय? )
रुग्णाच्या वेदना कशा समजतात?
अनेक वर्षांपासून प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णाला वेदना होत आहेत की नाही, हे ओळखणे आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत डॉक्टर्स रुग्णाच्या 'हीमोडायनेमिक्स'मधील बदलांवर लक्ष ठेवतात.
रुग्णाच्या हृदयाचे ठोके अचानक वाढले किंवा रक्तदाबामध्ये बदल झाला, तर त्याचा अर्थ रुग्णाला त्रास होत आहे असा घेतला जातो. अशा वेळी तातडीने पेनकिलर किंवा वेदनाशामक औषधे दिली जातात. ही औषधे आयुष्य वाढवण्यासाठी नसून, मृत्यूची प्रक्रिया वेदनामुक्त करण्यासाठी वापरली जातात.
निरोपाचा शेवटचा टप्पा
हरीश राणा यांचे हे प्रकरण भारतातील अशा प्रकारच्या पहिल्या घटनांपैकी एक आहे. या संपूर्ण प्रक्रियेला 2 ते 3 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळही लागू शकतो. रुग्णाचे शरीर पुसण्यापासून ते कपडे बदलण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट अत्यंत सन्मानपूर्वक केली जाते. हरीश यांच्या पालकांसाठी हा काळ अत्यंत भावूक आहे, कारण त्यांनी आपल्या मुलाला शांततेत आणि सन्मानाने निरोप देण्यासाठी हा कायदेशीर लढा जिंकला आहे. आता वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली हरीश यांचा हा प्रवासाचा शेवटचा टप्पा पार पडत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world